- महायुतीच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काढलेली रॅली अतिशय भव्यदिव्य – शिवाजीराव आढळराव पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
जुन्नर (दि. ०४ मे २०२४) :- महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ जुन्नर शहरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली. रॅली काढण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजीमहाराज यांना अभिवादन केले. ग्रामदैवत सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेत रॅलीस सुरवात केली. दरम्यान, या रॅलीत महिला, तरुण-तरुणी यांचा मोठा सहभाग होता. यावेळी महिलांनी ‘अबकी बार, चारसो पार’ शिवाजी दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, ‘एकच वादा, शिवाजी दादा’ अशी घोषणाबाजी केली.
ऐतिहासिक व जागृत असणाऱ्या कुकडेश्वराचे सकाळी दर्शन घेऊन आज जुन्नर तालुका दौऱ्याची सुरवात केली. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. महिलांनी औक्षण करुन स्वागत केले. दौऱ्यात महिला, तरुण-तरुणी यांनी मोठा सहभाग घेतला. आढळराव पाटील यांनी विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या घरी भेटी दिल्या.शंकरपुरा पेठ जुन्नर या ठिकाणी मोठी बाईक रँली व सभा झाली. या कोपरा सभेचे भव्य सभेत रुंपातर झाले. या सभेअगोदर आढळराव पाटील यांचे वाजत-गाजत फुले उधळून जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील,जुन्नरचे कार्यसम्राट आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, भाजप नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, अभिनेते रवीभाऊ काळे, संजय काळे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोषनाना खैरे,राष्ट्रवादीचे अध्यक्ष पांडुरंग पवार,पोपट रावते, साईनाथ ढमढेरे, सचिन खत्री,राजश्री इंगवले, संजय परदेशी, निलेशजी गायकवाड, माजी नगरसेवक अनिल मेहेर, श्रीकांत मिरगुंडे वइतर महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी व नेते उपस्थित होते.
नागरिकांना संबोधित करताना महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, मला अभिमान वाटतो की आमचे तालुक्याचे मनसेचे सर्व पदाधिकारी तसेच इतर सर्व महायुतीच्या घटक पक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काढलेली रॅली अतिशय भव्यदिव्य होती. माझे मन या स्वागताने भारावून गेले.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे देशाचा सर्वांगिण विकास होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपल्याला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक धोरणाला साथ देणारा खासदार निवडून द्यायचा आहे. २०१९ ला शिरुर मतदार संघात त्यांच्या विरोधातला खासदार निवडून देण्याचे परिणाम तुमच्यासमोर आहेत. कुठल्याही गावात मी गेलो की मला सांगितले जाते विद्यामान खासदार मागील पाच वर्षांत एकदाही गावात आले नाहीत. त्यांनी कोणतेच विकासाचे प्रश्न मार्गी लावले नाहीत, फक्त बोलघेवडेपणा केला. आता आपल्याला मोदीजी परत पंतप्रधान होणार असल्यामुळे त्यांच्या विचाराचा खासदार निवडून द्यायचा आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे माझे चिन्ह असलेले घड्याळासमोरचे बटन दाबून मला विजयी कराल ही विनंती करतो.
यावेळी बोलताना आमदार अतुल बेनके म्हणाले की, सकाळपासून आम्ही आदिवासी विभागापासून दौरा करत आहोत. आदिवासी विभागातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकांनी सांगितलं की, आमच्या गावात जे काही विकासकामे चालू आहेत, ते फक्त महायुतीच्या तीन घटक पक्षांमुळे सुरु आहेत.
आम्ही ज्याला मोठ्या विश्वासाने निवडून दिलं तो आमच्याकडे एकदाही फिरकलाही नाही.फक्त भाषणं करायची. म्हणायचे हिरडा कारखाना झाला पाहिजे, वन औषधीचा प्रकल्प झाला पाहिजे, पण प्रत्यक्षात तर काही करायचे नाहीत. व्यापारी, कामगार, शेतकरी, माळी, तेली, बौद्ध,मुस्लिम सर्वच समाज आज दादा यांच्या पाठीशी उभे आहेत. मागील निवडणूकीत लोकांमधून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीने कुठलीही कामे केलीली नाहीत. आता आपल्याला शिवाजी दादा यांना निवडून आणायचे आहे. यासाठी सर्वांनी जोरदारपणे मतदान करुन दादा यांना मोठे मताधिक्य मिळवून द्यायचे आहे.”
भाजप नेत्या आशाताई बुचके म्हणाल्या की, “समोरच्या उमेदवाराची आणि आपली बरोबरी कोणीच करु शकत नाही. दादांना 15 वर्षे खासदार म्हणून काम करताना आपण पाहिले आहे. दादा मागील निवडणुकीत पराभूत झाले, त्यामुळे आपल्या उत्तर पुण्याची हानी झाली. आपला लोकप्रतिनिधी माणसातला माणूस असायला हवा. तो आपल्या हक्काचा असावा म्हणजेच तो शिवाजी दादा यांच्या सारखा असावा. सरकारने दिलेला निधी समोरच्या खासदाराने परत घालवला एवढा निष्क्रिय खासदार मी पहिल्यांदा पाहिला आहे. त्यामुळे आता आपल्याला आपल्या कामाचा आणि हक्काचा माणूस म्हणजे दादा यांना निवडून आणायचे आहे.”
आमदार शरद सोनवणे म्हणाले की, “ही निवडणूक देशाच्या हिताची आणि संरक्षणासाठी खुप महत्वाची आहे. देशाचा विचार करुन या निवडणुकीकडे पाहायला हवे.आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ही भूमी आहे. आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा. कोरोनाच्या कठीण काळात आपले शिवाजीराव आढळराव पाटील या मातीतील माणसांच्या पाठीशी राहिले. त्यांनी सर्व प्रकारची मदत या मतदार संघातील नागरिकांना केली. मतदार संघातील विकासाच्या कामाची सुरवात म्हणजेच रेल्वे, रस्ते या सर्वांची मुहुर्तमेढ शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रोवली आहे. आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे उद्याच्या निवडणुकीत आढळराव दादांना प्रचंड बहुमतांनी विजयी करायचे आहे.”
अभिनेते रवीभाऊ काळे यांनी नागरिकांना आवाहन केले की आपल्या हक्काच्या माणसाला विजयी करुन आपल्या मतदार संघाचे प्रश्न मार्गी लावू. विकास कामे होण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांनो मोठ्या मताधिक्याने विजयी करावे.