- पालिकेकडून निधीसाठी तरतूद नसल्याचे कारण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२२) :- महापालिकेकडून दहावी – बारावीच्या बक्षीस योजनेतील अद्याप २ हजार ४०० विद्यार्थ्यांना बक्षीस रक्कम मिळालेली नाही. ही रक्कम संबंधित विद्यार्थ्यांना मे महिन्यापर्यंत मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी स्थानिक क्षेत्रीय कार्यालयात जाऊन योजनेचा अर्ज भरताना मिळालेली पावती व क्रमांक घेऊन चौकशी करावी. अर्जात चुका असल्यास दुरुस्त कराव्यात किंवा आवश्यक कागदपत्रे जमा करावेत व त्रुटी दुरुस्त करुन घ्याव्यात, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत महापालिका नागरवस्ती विभागाकडे निवेदन दिले आहे.
महापालिकेकडून बक्षीस योजनेतंर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केलेली होती. त्या रकमेतून ५ हजार ६५५ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. मात्र, मार्च अखेरीस सुमारे २४०० विद्यार्थ्यांचे अर्ज आले. त्यांना बक्षीस योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक तरतूद सध्या उपलब्ध नाही. ही तरतूद उपलब्ध व्हावी यासाठी आयुक्त राजेश पाटील यांच्या मंजुरीसाठी नागरवस्ती विभागाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना बक्षीस योजनेचा लाभ देण्यात येईल, असे उपायुक्त अजय चारठणकर यांनी स्पष्ट केले आहे.