न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात सध्या केवळ २१.८२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या पवना नदीतून ५१० एमएलडी पाणी दररोज उचलले जात आहे. गेल्या वर्षी १६ जूनच्या तुलनेत आजचा साठा १८ दशलक्ष घनफुटाने (टीएमसी) कमी अर्थात ७.६१ टक्क्यांनी कमी आहे.
पवना धरणात सध्या एकूण ८३.७३ घनफूट अर्थात २१.८२ टक्के पाणीसाठा आहे. त्यातील ५२.५९ घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा ३० जुलैपर्यंत पुरेल असा अंदाज आहे. त्यामुळे सध्यातरी शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन शाखा अभियंता, पवना धरण, जलसंपदा विभाग यांनी केले आहे.