- समितीचे एसपीओ, पोलीस मित्र तीन दिवस बंदोबस्तात होणार सहभागी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२२) :- जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान सोमवार दिनांक २० जून २०२२ रोजी देहू येथुन होणार असून दिनांक २१ रोजी निगडी येथे आगमन होणार आहे. कोरोना काळात सलग दोन वर्ष पायी वारी सोहळा स्थगित झाल्याने यंदाच्या वर्षी वारकरी मोठ्या संख्येने देहूत येण्याची शक्यता आहे. वैष्णव मोठ्या संखने पालखीत सहभागी होण्याची शक्यता धरून प्रशासन सुद्धा अलर्ट मोडमध्ये आहे. पोलीस विभाग सुद्धा सतर्क झाला असून सोहळा सुरक्षित पार पाडण्यासाठी वाहतूक स्वयंसेवक, एस पी ओ पोलीस मित्रांची सुद्धा मदत घेतली जाणार आहे. यानिमित्त निगडी येथे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पोलीस मित्र, विशेष पोलीस अधिकारी सदस्यांबरोबर पालखी आगमनानिमित्त निगडी वाहतूक विभागामध्ये बैठकीचे आयोजन केले होते.
बैठकीस निगडी वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षिका विजया कारंडे, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, महिला अध्यक्षा अर्चना घाळी, संतोष चव्हाण, विभावरी इंगळे, लक्ष्मण इंगवले, सतीश देशमुख, बाबासाहेब घाळी,शशिकांत इंगळे, बळीराम शेवते, भरत उपाध्ये, राजू येळवंडे,विशाल शेवाळे,राजेश बाबर, सतीश मांडवे,अजय घाडी,सुशेन येरूनकर, तेजस सापरिया, विजय जगताप,नितीन मांडवे,साक्षी पवार,उद्धव कुंभार, संजय महाजन,संजय लोखंडे,संतोष शिंदे,संजय कांबळे,संजय थोरात हे प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत पो. नि. विजया कारंडे म्हणाल्या,” कोरोना महामारीच्या कठीण कालखंडानंतर यंदा पायी वारी पालखी सोहळा संपन्न होत आहे, दोन वर्षे महाराष्ट्र राज्यातील तसेच परराज्यातील बहुसंख्य वारकरी म्हणजेच वैष्णव पालखी सोहळ्यातील पायी देहू ते पंढरपूर वारी करू शकला नाही.यंदाच्या वर्षी संक्रमण कमी प्रमाणात असल्यामुळे पालखी वारीमध्ये मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होण्याची शक्यता आहे.त्याकरिता संस्थेचे पोलीस मित्र दरवर्षोप्रमाणे पोलीस विभागास नक्कीच सहकार्य करतील.नेमून दिलेल्या प्रत्येक चौकामध्ये बंदोबस्ताकरीता कार्यरत असतील.
प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” यंदाच्या वर्षी तुकाराम बीज सोहळ्यात तीन लाखापेक्षा जास्त वैष्णव देहूत उपस्थित होते. हा गर्दीचा अनुभव लक्षात घेता, देहू नगरीत यंदाच्या पालखी सोहळ्यास मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे, सध्या राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्यमध्ये थोडी वाढ दिसून येत असून देहूत वैष्णवांनी मास्क वापरल्यास वारी नक्की सुरक्षित असेल, त्यामुळे ह्या वर्षी सुद्धा समितीच्या वतीने मास्क चे वाटप केले जाणार आहे.
देहूरोड पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षिका वर्षाराणी पाटील व पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत देहूमध्ये मास्क वाटप मोहिम राबविली जाणार आहे. तसेच निगडीतील प्रमुख चौकात समितीचे एसपीओ, पोलीस मित्र दिनांक २० ,२१,२२ ह्या तीनही दिवशी बंदोबस्तात सहभागी असणार आहेत. तसेच वैष्णवांना वैदयकीय मदतही दिली जाणार आहे. यंदाच्या वर्षी समितीचे १६५ स्वयंसेवक सहभागी असणार आहेत.