- आकुर्डीत संगीतमय ” श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहा ” ला उत्सवात प्रारंभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२२) :- लोक चारित्र्याचे पूजन करतात म्हणून भारत हा विश्वगुरु आहे. गुरु हे अंधकारातून प्रकाशाकडे नेतात. ईश्वराने मनुष्याला सुंदर बनवले आहे. तरुणांनी धुम्रपान करणे टाळावे. संस्कारवान, चरित्रवान बनावे. कथेचा सार सोडू नका आचरणात आणा. मोबाईलच्या रेंजसाठी जसा टावर आवश्यक आहे. त्याप्रमाणे मनुष्याच्या प्रगतीसाठी सकारात्मक मनाची गरज आहे, असे प्रतिपादन पं. पू. श्री. प्रद्युम्नजी महाराज यांनी भक्तांना उद्देशून केले.
हनुमान मित्र मंडळ आणि गुप्ता-जैसवाल फाऊंडेशनच्या वतीने आकुर्डीतील खंडोबा मंदिर सभागृहात संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रसंगी पं. पू. श्री. प्रद्युम्नजी महाराज बोलत होते. ” श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी; हे नाथ नारायण वसुदेओ ” च्या गजरात भाविक भक्तिरसात आकंठ बुडाले होते.
कलश यात्रेसह बुधवारी प्रारंभ झालेला भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह येत्या बुधवार (दि. १६) पर्यंत सायं. ४.३० ते रात्री ८.१५ वाजता नियमित सुरु राहणार आहे. शनिवार (दि. १२) वामन अवतार श्रीराम कृष्ण जन्मोत्सव, रविवार (दि. १३) बाल लीला, माखन चोरी लीला, चीर हरण व गोवर्धन लीला, सोमवार (दि. १४) द्वारिका लीला रुक्मिणी मंगल, मंगळवार (दि. १५) सुदामा चरित्र, परिक्षित मोक्ष शुकदेव पूजन, भागवत पूजन आणि बुधवार (दि. १६) रोजी पुर्णाहुति ब्राह्मण भोजन आणि महाप्रसाद वितरणाने या धार्मिक कार्यक्रमाची सांगता होणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदवून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक तथा कथा सप्ताह समितीचे अध्यक्ष विजय गुप्ता आणि त्रिभुवन तिवारी यांनी केले आहे.