- कोर्टाच्या निर्णयाचे कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्याकडून स्वागत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२२) :- टू व्हीलर, टॅक्सी, रॅपिडो कंपनीची याचिका उच्च न्यायालयाने रद्द करून टु व्हिलर, टॅक्सी बंदीचा निर्णय कायम ठेवला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी स्वागत केले आहे.
उच्च न्यायालयात महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशनच्या वतीने अॅड. अक्षय देशमुख यांनी बाजू मांडली. यावेळी बाबा कांबळे, आनंद तांबेसह मोठ्या संख्येने रिक्षा चालक-मालक उपस्थित होते.
१३ जानेवारी रोजी उच्च न्यायालयाने टू व्हीलर, टॅक्सीवर बंदी आणली. हाच निर्णय त्यांनी पुढे कायम ठेवला असून टू व्हीलर रॅपिडोची याचिका त्यांनी खारीज केली असून आता ही लढाई पुढे सुप्रीम कोर्टामध्ये लढली जाणार आहे. रॅपिडो कंपनीच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्यात आले असून ३० जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टामध्ये याबाबत सुनावणी होणार आहे.
रिक्षा चालक मालकांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये रिक्षा बंद आंदोलन करून वर्षभरापासून सातत्याने या प्रश्नावर आवाज उठून आंदोलन केले. रिक्षा संप देखील केला आहे. यामुळे पुणे प्रशासनाने टू व्हीलर टॅक्सीवर एफआयआर दाखल केला होता. या विरोधामध्ये रॅपिडो कंपनी उच्च न्यायालयामध्ये गेले. उच्च न्यायालयात त्यांनी दाद मागितली. उच्च न्यायालयाने देखील या सेवा बेकादेशीर असून या सेवा बंद करण्याचा आदेश दिला. आता या कंपन्यांच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. रिक्षा संघटनांच्या वतीने देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली असून आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय देऊ नये असे यामध्ये म्हटले आहे.
बाबा कांबळे म्हणाले, आम्ही रस्त्यावरची लढाई जिंकलो. मा. उच्च न्यायालयामध्ये देखील आम्ही आमची बाजू मांडली. उच्च न्यायालयात आमचा विजय झाला. आता सुप्रीम कोर्टामध्येदेखील आम्ही लढाई लढत असून सुप्रीम कोर्टात देखील आमचा विजय होईल आणि देशातील सर्व रिक्षा टॅक्सी टुरिस्ट परमिट धारकांना न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्ही न्यायदेवतेचे आभार व्यक्त करतो. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील २० लाख रिक्षा टॅक्सी चालक-मालक तर देशातील १४ कोटी टुरिस्ट परवानाधारकांना याचा लाभ होईल, असे यावेळी बाबा कांबळे म्हणाले.