- सत्ताधारी नगरसेवक केंदळे यांचा आयुक्तांना सवाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै. २०२०) :- मागील वर्षी चालू करण्यात आलेला दिवसाआड पाणीपुरवठा हा दोन महिन्यासाठी होता. त्यानंतर तो आजपर्यंत कायम ठेवला आहे. आयुक्तांनी शहरातील नागरिकांना पुन्हा एकदा पाणीपुरवठ्याबाबत सूचित करावे. नागरिकांच्या मनातील प्रश्नांचा विचार करून खरी वास्तविक परिस्थिती निदर्शनास आणून द्यावी, अशी मागणी भाजप नगरसेवक उत्तम केंदळे यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सद्य परिस्थितीमध्ये रावेत जलशुद्धीकरण उपसा केंद्राची क्षमता संपली आहे. चिखली या ठिकाणी नवीन जलउपसा केंद्राचे काम चालू आहे. चिखली प्लॅन्टचे काम किती दिवसात पूर्ण होणार आहे, हे पण तितकेच महत्वाचे आहे. भविष्यात चिखली उपसाकेंद्र येथे शहरासाठी येणारे पहिल्या टप्प्यातील १०० एमएलडी पाणी किती दिवसात शहराला मिळेल व दररोज पाणी पुरवठा कधीपर्यंत होईल, याची माहिती आयुक्तांनी नागरिकांना देणे आवश्यक आहे. तसेच येत्या वर्षा-दोन वर्षात वाढणाऱ्या लोकसंख्येचासुद्धा यामध्ये विचार केला पाहिजे. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आयुक्तांनी पालिकेच्या सर्व नगरसेवकांना व शहरातील नागरिकांना देणे गरजेचे आहे.
समन्यायी पाणी वाटप आणि अपूऱ्या पाणीपुवठ्यावर पर्याय शोधणे, गळती, पाणी चोरी रोखण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणीपुरवठा विभागास दोन महिन्यांची मुदत देत, एकदिवसआड पाणी पुरवठा आज पर्यंत आठ महिने होऊनही कायम ठेवला आहे. मागील वर्षी नोव्हेंबर २०१९ रोजी एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. पवना धरण शंभर टक्के भरले असतानाही तसेच योग्य पाणीसाठासुद्धा उपलब्ध असताना देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पिंपरी-चिंचवड शहरात गंभीर बनला होता.
‘‘पिंपरी – चिंचवडची लोकसंख्या आजमितीला २७ लाखांच्या आसपास आहे. त्यासाठी पवना धरणातून दररोज ५०० दलघमी पाणी उपसा केला जातो. त्यापैकी ३८ ते ४० पाण्याची गळती होते. शहरात एक लाख ५० हजार नळजोड आहेत. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आजमितीला ६०० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. समन्यायी पाणीवाटपासाठी चोवीस तास अखंड पाणीपुरवठा करणे, पाणीवितरण व्यवस्था मजबूत करणे, नळजोड बदलणे, जलवुंष्ठभ बांधणे आदी कामे सुरु केली. वाढती लोकसंख्या आणि ४० टक्के पाणीगळती विचारात घेता दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता ’’ असमान पाणीवाटपामुळे काही भागांना कमी पाणीपुरवठा होत आहे. उंचावरील वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळेनिलख, सांगवी, दापोडी, दिघी, मोशी, च-होली या भागाला कमी पाणी जाते. त्यामुळे सगळ्या भागाला समन्यायी पाणी वाटप होणे अपेक्षित होते. एकदिवसाआड पाणीपुरवठा केल्यास समन्यायी पाणी पुरवठा होईल. पाण्याची टंचाई नसतानाही पाण्याचे समन्यायी वाटप व्हावे, यासाठी एकदिवसाड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. दोन महिने ही पाणी कपात असणार आहे. दोन महिन्यात पाणीपुरवठा विभागाने त्यामध्ये सुधारणा करायच्या आहेत. यावर्षी पाणीटंचाईचे सावट नाही. पाणी पर्याप्त आहे. बचतीचे धोरण चांगले असून समन्यायी पाणी वाटपासाठी हा निर्णय चांगला असल्याचे त्यावेळी आयुक्त म्हणाले होते. प्रत्यक्षात मात्र, शहरातील नागरिकांना अजून किती दिवसा दिवसाआड पाणीपुरवठा धोरणाला सामोरे जावे लागेल, याचे आयुक्तांनी उत्तर द्यावे, असे या निवेदनात केंदळे यांनी म्हटले आहे.