- मोजक्या मानक-यांसोबतच तुळजाभवानीची पुजा संपन्न…
- ज्योत नेणाऱ्यास देखील यंदा तुळजापुरात मज्जाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२०) :- कोरोनाचा प्रादुर्भाव तथा संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घेत राज्य सरकारने अद्याप राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाने घेतला आहे.
सणानिमित्त आयोजित मेळावा तथा समारंभास ५० व्यक्तींची मर्यादा ठरवून देण्यात आली असून गरबा, दांडीयावरही बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू राहील, असे सोलापूरच्या पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे..
शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी कोणत्याही नवरात्र मंडळास तथा भाविकास श्रीक्षेत्र तुळजापूर शहरात प्रवेश दिला जाणार नाही. या महोत्सवात पूर्वीपार प्रथा-पंरपंराप्रमाणे फुलाचार, धार्मिक विधी, पुजेसाठी आवश्यक पुजारी, महंत, सेवेकरी व मानकऱ्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी प्रातांधिकारी, मंदिर तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, तुळजापूर यांची मान्यता घ्यावी लागणार आहे. या काळात मंदिर संस्थानाकडून रॅपिड ऍन्टीजेन टेस्टद्वारे उपस्थितांची तपासणी करण्याचा निर्णयही मंदिर संस्थानाने घेतला आहे. नवरात्र महोत्सवात जागोजागी निर्जंतुकीकरण केले जाणार असून सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच सामाजिक अंतराचे पालन करणे प्रत्येकांना बंधनकारक असणार असून त्यांना मास्क वापरण्याची सक्ती केली आहे.