- राज्यात या दोन पक्षांत युती होण्याची शक्यता?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२०) :- राज्यात नुकत्याच शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता नवी मुंबई व औरंगाबाद पालिका निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकारविरोधातील अनेक आंदोलनांत भाजप व मनसेत समंजसपणा सुरू झाल्याने राज्यात या दोन पक्षांत युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याची सुरुवात नवी मुंबई व औरंगाबाद पालिका निवडणुकांपासून करण्याची तयारी सुरू करण्यात येत आहे. नवी मुंबईत मनसेने २० प्रभागात दावा केला असून भाजप दहा ते बारा प्रभाग देण्यास तयार असल्याचे समजते.
करोना साथरोगामुळे नवी मुंबई पालिकेच्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. मे महिन्यात १११ नगरसेवकांची मुदत संपली असून त्यांच्या जागी पालिका आयुक्तांना प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांना या महिन्यात पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. या सहा महिन्यांत राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी जनगणना कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याने सर्व निवडणुका २०११ च्या जणगणनेनुसार लवकरात लवकर घेतल्या जाणार आहेत. महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असल्याने राज्यातील सर्व पालिका, नगरपािलका आणि पंचायत निवडणुका घेण्यात याव्यात, असा अहवाल राज्य गुप्तचर विभागाने सरकारला दिला आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत नवी मुंबई पालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता असून युती, आघाडीचे वारे वाहू लागले आहेत.