न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२०) :- विराज जगताप यांची हत्या करणा-या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच संबंधीत घटनेतील तरुणीला सहआरोपी करावे. अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पिंपरी येथे केली.
रविवारी रात्री (७ जून) पिंपळे सौदागर येथील विराज जगताप या बौध्द तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली. केंद्रीय मंत्री आठवले यांनी शनिवारी (दि. १३ जून) सायंकाळी जगताप यांच्या कुटूंबांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यानंतर पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. यावेळी आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे, सुरेश निकाळजे, परशूराम वाडेकर, बाळासाहेब रोकडे, के.एम. बुख्तर, सम्राट जकाते, सुधाकर वारभुवन आदी उपस्थित होते.
यावेळी आठवले म्हणाले की, विराजची हत्या ही घटना अंत्यत गंभीर आहे. महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते की, सवर्ण, मराठा आणि मागासवर्गीय समाज एकत्र आला पाहिजे. जाती जातीमधील कटूता नष्ट झाली पाहिजे. मराठा समाज व मागासवर्गीय समाजाने राज्यात गुण्या गोविंदाने रहावे यासाठी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आपण नेहमी प्रयत्नशील असतो.