न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 30. जून. 2020) :- टाळ-मृदंगाचा गजर, विठू-रखुमाईचा जयघोष आणि देहभान हरपून पंढरीच्या ओढीनं पायी चालणारे वारकरी…हे चित्र यंदा कोरोना विषाणूमुळे दिसलं नसलं, तरी पालखीची परंपरा पार पडणार आहे. पालखीचं स्वरूप मात्र यंदा वेगळं आहे. यंदा शिवनेरी बसमधून 20 वारकऱ्यां सोबत पालखी पंढरीत पोहोचेल.
एक जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे श्री विठ्ठलाची महापूजा करतील. ही महापूजा आज 30 जून रोजी मध्यरात्री 11.30 ते 1 जुलैच्या पहाटे 1.30 वाजेपर्यंत असेल. त्यामुळे आज मंगळवारीच (30 जून) पंढरीत सर्व मुख्य पालख्या पोहोचणं अपेक्षित आहे आणि तशी शासन-प्रशासनासह पालखी संस्थानांकडून तयारीही झालीय.
चंद्रभागेच्या वाळवंटात वर्षानुवर्षांच्या परंपरेनुसार लाखो वारकऱ्यांच्या उपस्थित हरिनामाचा गजर ऐकायला मिळणार नसला, तरी वारीची पंरपराही खंडित होणार नाहीय.
यंदा किती पालख्या पंढरीत येतील?
पंढरपूरमधील श्री रुक्मिणी मंदिर समितीचे सहाय्यक लेखाधिकारी विनोद पाटील यांच्याकडे सरकारनं पालख्यांच्या समन्वयाची जबाबदारी दिली असल्याचे त्यांनी सांगितलं. यंदा एकूण 9 पालख्यांना आरोग्यासंबंधी सुरक्षेची सर्व काळजी घेऊन पंढरपुरात येण्यास परवानगी दिलीय.
या 9 पालख्यांना परवानगी :-
संत एकनाथ महाराज संस्थान (पैठण)
संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान (त्र्यंबकेश्वर)
संत सोपानदेव महाराज संस्थान (सासवड)
श्री संत चागगवटेश्वर देवस्थान (सासवड)
संत मुक्ताबाई संस्थान (मुक्ताईनगर, जळगाव)
विठ्ठल-रुक्माई संस्थान (कौंडिण्यपूर, अमरावती)
संत तुकाराम महाराज संस्थान (देहू)
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान (आळंदी)
संत नामदेव महाराज संस्थान (सोलापूर)
‘इन्सिडंट कमांडर’ची नेमणूक
या पालख्यांसोबत प्रशासनातील उच्चपदस्थ एक अधिकारीही असेल. ‘इन्सिडंट कमांडर’ असं त्याला संबोधलं गेलंय. ज्या जिल्ह्यातून पालखी निघेल, त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने ‘इन्सिडंट कमांडर’ची नेमणूक केलीय.
यातील आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पालखीसाठी ‘इन्सिडंट कमांडर’ म्हणून पुण्यातील खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेली यांची नेमणूक करण्यात आलीय.
संजय तेली यांनी सांगितलंय की, “सध्या कोरोनाच्या रुपानं मोठं आरोग्य संकट आहे. या वातावरणात कुठलीही बाधा न येता वारीची परंपरा पूर्ण व्हावी म्हणून इन्सिडंट कमांडर नेमण्यात आलेत. आरोग्य सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी इन्सिडंट कमांडरवर असेल.”प्रत्येक पालखीसोबत जास्तीत जास्त 20 जणांना पंढरीत येण्यास परवानगी देण्यात आली असून, शिवनेरी बसने पालखी मंगळवारी (30 जून) दुपारी दोन वाजता पंढरीच्या दिशेनं प्रस्थान करेल, अशीही माहिती संजय तेली यांनी दिली.
रात्री 11 वाजेपर्यंत पंढरपुरात पोहोचण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. त्यामुळे दुपारी निघाल्यानंतरही सहज पोहोचता येईल, असं तेली म्हणतात. मात्र, अर्थात इतर पालख्यांच्या ठिकाणांनुसार त्या त्या पालख्या वेळेचं नियोजन करून निघतील.
वारकऱ्यांची काय काळजी घेतली जाईल?
संजय तेली यांच्या माहितीनुसार, पालखीसोबत जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांची आणि शिवनेरी बसच्या चालकाची कोव्हिड चाचणी घेतली जाईल. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह येईल, त्यांनाच सोबत नेलं जाईल. शिवाय, एसटी बसचंही पूर्णपणे निर्जंतुकीकरण केलं जाईल.
या पालख्यांचे पंढरपुरातील समन्वयक म्हणून काम पाहणारे विनोद पाटील यांनीही संजय तेली यांच्या माहितीला दुजोरा दिला.
विनोद पाटील म्हणाले, “कोरोना निगेटिव्ह असल्याचे अहवाल असायला हवेच, शिवाय वारकरी 60 पेक्षा कमी वयाचा असेल, याचीही दक्षता घेण्याचे आदेश आहेत. “शिवाय, सध्याच्या आरोग्य संकटात आपण नेहमी ज्या खबरदारी घेतोय, म्हणजेच मास्क वापरणं, सॅनिटायझर, फेसशिल्ड, हँडग्लोव्ह्ज इत्यादी गोष्टी तर बंधनकारक आहेतच.
पालख्या पंढरीत पोहोचल्यानंतर कार्यक्रम कसा असेल?
30 जून रोजी पालख्या पंढरपुरात दाखल होतील. रात्री 11.30 ते एक जुलैच्या पहाटे 1.30 वाजेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महापूजा होईल. त्यानंतर 1 जुलै रोजी पहाटे मानाच्या सर्व पालख्या चंद्रभागेत स्नान करतील आणि प्रदक्षिणा घालून मठात दाखल होतील. 2 जुलै रोजी पालख्यांची भेट झाल्यानंतर संध्याकाळी आपापल्या ठिकाणी प्रस्थान करतील.