न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. 30. जून. 2020) :- कोरोनावर नियंत्रण अजूनही मिळालेलं नसल्यामुळे अजूनही सार्वजनिक जीवनावर निर्बंध कायम असतील, असं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून याची कल्पना दिलेली होती. आता केंद्राने औपचारिक घोषणा करत कुठल्या गोष्टींवर निर्बंध असतील, हे स्पष्ट केलं आहे. Unlock च्या पहिल्या टप्प्याप्रमाणे मेट्रो, मॉल, जिम यासह शाळा, कॉलेजही बंद राहतील, असं गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
1 जुलै ते 31 जुलै या काळात नाईट कर्फ्यू असेल. म्हणजे रात्री 10 ते सकाळी 5 पर्यंत संचाबंदी असेल. महाराष्ट्रात Unlock 2.0 ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पण म्हणजे नेमके कुठले व्यवहार खुले होणार आणि कुठले निर्बंध कायम राहणार याविषयी स्पष्टता आणणारा केंद्राचा आदेशही आता निघाला आहे.
Misshion Begin again ही योजना सुरू असली, तरी Coronavirus चा वाढता धोका लक्षात घेऊन प्रादुर्भाव वाढतो आहे त्या ठिकाणी कडक लॉकडाऊन लागू होणार आहे. 31 जुलैपर्यंत हे निर्बंध कायम असतील, हे स्पष्ट झालं आहे. कोरोनाचा धोका कायम असल्यानं देशभर लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 जुलैपर्यंत टप्याटप्याने शिथिलता दिली जाणार आहे. मिशन बिगेन अगेन अंतर्गत दिलेल्या शिथिलताही सुरू राहतील.
हे राहणार बंद
शाळा, कॉलेज, शॉपिंग मॉल, थिएटर, नाट्यगृह, जिम, सार्वजनिक वाहतूक, मेट्रो, आंतरराष्ट्रीय विमानसेवा.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक भागात कोरोनाचा वेगाने फैलाव सुरू झाला. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांपासून जिथं आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला नव्हता अशा ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे अधिक कोरोना रूग्ण असलेल्या मुंबईसह एमएमआर परिसरात तसंच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर महापालिका परिसरात अधिक निर्बंध असणार आहेत.