न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. जुलै. २०२०) :- राज्यातील अराजपत्रित पदांची (वर्ग १ ते ४) भरती प्रक्रिया एम.पी.एस.सी. द्वारे घेण्यात यावी, अशी मागणी ‘आप’ युवा आघाडीच्या वतीने मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन ‘आप युवा आघाडी – पुणे’ जिल्ह्याचे अध्यक्ष चेतन बेंद्रे, आशुतोष शेळके, मोहसीन गडकरी, सोहम नारखडे यांनी अपर तहसीलदार पिंपरी-चिंचवड यांच्याकडे दिले.
महाविकास आघाडी सरकारने “महापोर्टल” बंद करुन विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली, आता पुन्हा अश्याच कोणत्या खाजगी कंपनी द्वारे चालवल्या जाणाऱ्या नवीन पोर्टल द्वारे ही भरती प्रक्रिया न करता, एम.पी.एस.सी. द्वारेच ही भरती प्रक्रिया व्हावी अशी रास्त मागणी विद्यार्थी करत आहेत.
राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एम.पी.एस.सी) ला विचारणा केली असता एमपीएससी ने देखील भरती प्रक्रिया घेण्याबाबत तयारी देखील दर्शवली आहे, आता प्रशासन स्तरावर पुढील निर्णय घेऊन एमपीएससी ला ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी त्यांना हिरवा कंदील द्यावा अशी मागणी ‘आप’ युवा आघाडीने केली.