- श्री राम मंदीर निर्माणासाठी भाविकांना १०००, १०० व १० रुपयांच्या कूपन्सची व्यवस्था..
- ऑनलाईन निधी देण्याचीही सोय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२१) :- श्रध्दा, भक्ती, अस्मितेचे आणि आस्थेचे स्वाभिमानाचे प्रतिक असणारे भगवान श्री रामाचे मंदिर अयोध्येत उभारण्यात येणार आहे. यासाठी स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी समर्पण संकलन निधीत सहभाग घ्यावा. सामाजिक समरसतेचे प्रतिक असणारे हे श्री राम मंदिर आदर्श रुपाने राहणार आहे. यासाठी देशाच्या इतिहासातील सर्वात मोठे अराजकीय संपर्क अभियान १५ फेब्रुवारी ते २७ मार्च पर्यंत देशभर राबविण्यात येणार आहे. देशातील ११ कोटींहून जास्त कुटूंबांपर्यंत पोहचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व सामान्य नागरिकांनादेखील यामध्ये सहभाग घेता यावा म्हणून दहा रुपये, शंभर रुपये आणि हजार रुपयांचे कुपन तसेच ऑनलाईन निधी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. देणगीदारांना ८० जी अंतर्गत सवलत मिळणार आहे. स्वयंस्फूर्तीने मिळणारा समर्पण निधी संकलित करुन न्यासाकडे दिला जाईल अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलींद परांडे यांनी दिली.
मंगळवारी (दि. १२ जानेवारी) पिंपरी येथे ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर निर्माण निधी समर्पण व जनजागरण अभियान’ची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परांडे बोलत होते. यावेळी प्रांत सह संपर्क प्रमुख मिलींद देशपांडे, विभाग संघचालक आप्पासाहेब गवारे, पुज्य शांतीब्रम्ह हभप मारोतीबुवा कु-हेकर महाराज, देहू देवस्थानचे अध्यक्ष हभप मधूकर महाराज मोरे आदी उपस्थित होते.
मिलींद परांडे यांनी सांगितले की, माननिय राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्व केंद्रीय मंत्री मंडळासह, सर्व राज्यातील मुख्यमंत्री, देशभरातील कलाकार, उद्योजकां पासून सामान्य नागरिकांपर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अयोध्या येथे श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने होणार असलेल्या राम मंदिराचे कार्य आता गतिमान झाले आहे. सुमारे पाच शतके चाललेला रामभक्तांचा संघर्ष यशस्वी होऊन दि. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार केंद्र शासनाने श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना केली. न्यासाच्या विनंतीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट २०२० रोजी श्री राम जन्मभूमीच्या जागी भूमिपूजन व शिलापूजन करून कार्याचा श्रीगणेशा केला. प्रस्तावित निर्माणाधीन मंदिर तीन मजल्यांचे असेल. प्रत्येक मजल्याची उंची २० फूटांची असेल. मंदिराची एकूण उंची १६१ फूट तर लांबी ३६० फूट आणि रूंदी २३५ फूट असेल. त्यावर पाच शिखर असतील. त्याचे संपूर्ण बांधकाम केवळ दगडांनी केलेले असेल यामध्ये सिमेंट व लोखंडाचा वापर होणार नाही. मंदिर परकोटाच्या बाहेर यज्ञशाळा, सत्संग भवन, संग्रहालय, संशोधन केंद्र, प्रदर्शन, अतिथी भवन इत्यादी सर्व अत्याधुनिक सोई-सुविधा उभारण्यात येतील. एकूण तीन ते साडे तीन वर्षांच्या अवधीत हे कार्य पूर्ण होईल. मंदिर निर्माणानंतर तेथे संपूर्ण भारत देश, नंतर जवळपासचे आशियाई देश व त्यानंतर संपूर्ण जगातील रामभक्तांचा संपर्क, समन्वय, सहयोग आणि समरसतेच्या केंद्राच्या रूपात जगाच्या सांस्कृतिक राजधानीचे केंद्र बनेल असा प्रयत्न आहे.
या महान कार्यासाठी रामभक्तांचा सहभाग निश्चित करण्यासाठी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या विनंतीवरून मकर संक्रांतीपासून माघ पौर्णिमा पर्यंत म्हणजे दि. १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत “निधी समर्पण अभियाना’चा संपूर्ण देशभर होत आहे. या माध्यमातून देशातील चार लाख गाव तसेच ११ कोटी कुटुंबांपर्यंत पोचण्याचे नियोजन केले आहे. आर्थिक पारदर्शिता रहावी म्हणून रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने पावती पुस्तके व १०००/-, १००/- आणि १०/- रुपयांच्या कूपन्सची व्यवस्था तसेच ऑनलाईन निधी देण्याचीही सोय आहे. या अभियानाकरिता विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकारात सर्व रामभक्त व कार्यकर्ते प्रत्येक जाती, संप्रदाय, मत, पंथ, क्षेत्र, भाषा, प्रदेशातील भाविकांशी संपर्क व जनजागरण करतील.