- ७० लाखांचे साहित्य जळून खाक; आगीवर नियंत्रण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
(पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२१) :- आकुर्डी येथील जयहिंद चौकात सारडा यांचे ३० ते ३५ वर्षांपासून दोन मजली घरामध्येच कपड्यांचे दुकान आहे. भारती सारडा एकट्याच दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहत होत्या. तसेच, त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य दुकानाच्या जवळील घरात राहतात.
सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे कापड दुकानाचा दरवाजा आतून बंद करून भारती सारडा दुकानाच्या वरच्या मजल्यावर झोपल्या. त्यानंतर पहाटेच्या सुमारास दुकानाला अचानक आग लागली. दुकानातील कपड्यांनी पेट घेतल्याने आग भडकून प्रचंड धूर झाला. त्यामुळे गुदमरल्याने वरच्या मजल्यावरील भारती सारडा यांनी दुकानात जाऊन दुकानाचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र आग मोठी असल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. आगीत जळून सुमारे ७० लाखांचे नुकसान झाले. आकुर्डी येथे म्हाळसाकांत चौकाजवळ जयहिंद चौक येथे मंगळवारी (दि. २३) पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. भारती नंदलाल सारडा (वय ६८), असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
दरम्यान, पहाटे तीनच्या सुमारास महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या प्राधिकरण उपकेंद्राला याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर प्राधिकरण, तळवडे, वल्लभनगर या केंद्रातील तसेच बजाज ऑटो कंपनीतील असे चार अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सकाळी सात वाजेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.