- शहराध्यक्ष सचिन चिखलेंच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेत मोठ्या आशेने गोरगरिबांनी अर्ज केले. घरांच्या सोडतीच्या यादीत नाव न आल्याने अनेकांची निराशा झाली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ३६६४ सदनिकांसाठी ४८ हजार नागरिकांनी अर्ज भरले होते. पाच हजार रकमेचा डिमांड डाफ्ट जमा करण्यात आला होता. मात्र, आजपावतो पालिकेने पाच हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केलेले नाहीत. याबाबत पिंपरी चिंचवड शहर मनसे अध्यक्ष तथा गटनेते सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांना निवेदन देऊन, तत्काळ पाच हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली.
यावेळी मनसे अध्यक्ष तथा गटनेते सचिन चिखले, पिंपरी विधानसभा विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे, कर्मचारी सेना अध्यक्ष रुपेश पटेकर, भोसरी विधानसभा उपशहाराध्यक्ष विशाल मानकरी, वाहतूक सेना शहराध्यक्ष सुशांत साळवी, महिला शहर सचिव सीमा बेलापूरकर आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे बिघडलेली आर्थिक गणिते आणि पैशाची चणचण गोरगरिबांना भासत आहे. त्यामध्ये पुन्हा परत कोरोनाने डोके वर काढले आहे. अनेक लोकांचे बळी जात आहेत. आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे आणि त्यामध्ये अजून लोकडाउनची भीती लोकांमधे निर्माण झाली आहे. घराच्या अर्जासाठी काडीमोड केली. लॉकडाऊनवेळी खिशात पैसे देखील नव्हते. पै पै जमा करून अर्ज केला. आता खिशात दमडी नाही. दररोजचा उदरनिर्वाह लोकांना अवघड होतं चालला आहे. लॉकडाउन लागल्याने सर्वसामान्य नागरिक हतबल झाला आहे. काहींनी हे पैसे अजून भेटले नाही तरी घर मिळेल या आशेने नवनगर विकास प्राधिकरणाच्या घरांसाठी अर्ज केला आहे.
पंतप्रधान आवास योजनेमध्ये पाच हजार रकमेचा डिमांड ड्रफ्ट जमा करण्यात आला होता. या योजनेत २०१७ मधील अर्जाचा देखील समावेश आहे. अनेक दिव्यांग आणि दुर्बल घटकांतील बांधवांनी अर्ज भरले आहेत. सोडत झालेली असून जे बाकीचे अर्जदार आहेत त्यांचा खात्यामध्ये अद्यापही पाच हजार ही रक्कम जमा झालेली नाही. सध्या कोरोनाच्या काळात नागरिकांना अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान आवास योजनेतील नागरिकांची रक्कम त्वरित त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करावी. त्यामुळे लॉकडाउन काळामध्ये त्यांना थोडा हातभार लागेल, असे या निवेदनात म्हटले आहे.