शरद पवारांवर पालिका निवडणुकीत लक्ष देण्याची वेळ आलीय – चंद्रकांत पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०२१) :- महाराष्ट्रात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यात महाराष्ट्र सरकार तत्परता दाखवत नाही. कारवाई करत नाही मात्र अभिनेता शाहरूख खानच्या मुलाचा यांना पुळका. यांचे अल्पसंख्याक मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक रोज काहीतरी त्यावर बोलतात. या सर्व प्रकरणामागील पाळंमुळं काढण्यासाठी हायकोर्ट जामीन देत नसेल, तर एवढं तडफडण्याचं काम नाही, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी लगावला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पिंपरी-चिंचवड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आर्यन खान, जरंडेश्वर साखर कारखाना, आगामी महापालिका निवडणुक यावरील प्रश्नांवर उत्तर देताना, महाविकासआघाडी सरकार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
पाटील यावेळी म्हणाले की, मला एक सामान्य नागरिक म्हणून प्रश्न पडला आहे की, एवढा यांना शाहरूख खानच्या मुलाचा पुळका का आला? म्हणजे नवाब मलिक रोज काहीतरी त्यावर म्हणणार, मग महाराष्ट्र सरकार आता काय सर्वोच्च न्यायालयात जाणार. महाराष्ट्रात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यात महाराष्ट्र सरकार तत्परता दाखवत नाही. शाहरुख खानच्या मुलाला जामीन मिळत नाही, एक बर झालं हायकोर्टावर यांचा संशय नाही. अन्यथा ते म्हणाले असते हायकोर्ट देखील यांनी मॅनेज केलं. पाळंमुळं काढण्यासाठी हायकोर्ट जामीन देत नसेल, तर एवढं तडफडण्याचं काम नाही. हे सर्व बरोबर नाही.” असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील म्हणाले.
आमचे आमदार, नगरसेवक कसे नीट राहतील यासाठी आम्ही समर्थ आहोत. शरद पवारांवर महानगर पालिकेच्या निवडणुकांमध्ये लक्ष देण्याची वेळ आली. अजित पवार, अमोल कोल्हे हे लक्ष घालत आहेत याचा अर्थ असा की आम्हाला हरवणं सोपं नाही. ”
– चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजपा.