राज्यपालांच्या हस्ते ‘पढेगा भारत’ जीओ टिव्ही चॅनलचे पिंपरीत उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०२१) :- रोज वेगाने विकसित होणा-या तंत्रज्ञानामुळे मानवी बुध्दीमत्तेला आता कृत्रिम बुध्दीमत्तेची साथ मिळत आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग भारतातील खेडोपाड्यात वेगाने आणि कमी खर्चात शिक्षण पोहचविण्यासाठी होणार आहे. मानवाचा प्रवास आता मानवी बुध्दीमत्तेकडून कृत्रिम बुध्दीमत्तेबरोबरच अध्यात्मिक बुध्दीमत्तेकडे व्हावा अशी अपेक्षा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ‘पढेगा भारत’ या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मचे जीओ टिव्ही चॅनलवर लॉचिंग शनिवारी (दि. २५ डिसेंबर) पिंपरीत करण्यात आले. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रिलायन्स इनोव्हेशन कौन्सिलचे चेअरमन डॉ. रघुनाथ माशेलकर, भारत सरकार एनसीडीएनटीचे चेअरमन दादा इदाते, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरु डॉ. नितिन करमळकर, जीओचे दिपक शिवले, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी खासदार अमर साबळे, पढेगा भारतच्या चेअरमन वेणू अमर साबळे आदी उपस्थित होते.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, जीओच्या सहयोगाने ‘पढेगा भारत’ ची सुरुवात होणे हा आनंदाचा क्षण आहे. अणूस्फोटाचे तंत्रज्ञान विकसीत करुन वीस वर्षे पडून होते. परंतू तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ११ मे १९९८ रोजी आंतरराष्ट्रीय दबाव झुगारुन अणूस्फोट केला. डॉ. माशेलकर यांच्या नेतृत्वाखाली केलेला संकल्प तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सिध्दीस नेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने डिजीटल इंडियासाठी केलेल्या कामामुळे जग आता भारताकडे एक प्रेरणा म्हणून पहात आहे असेही राज्यपाल कोश्यारी म्हणाले.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले की, दहा कोटी शेतक-यांना एकाच वेळी एका क्लिकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाच्या तंत्रज्ञानामुळे अनुदान दिले. शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य पढेगा भारतच्या माध्यमातून होणार आहे. यातून चांगली सुसंस्कारीत पिढी घडेल तसेच उद्योजक, डॉक्टर, वकील, अभियंते, शिक्षक आणि जबाबदार नागरीक घडतील. या दृकश्राव्य माध्यमातून मिळणा-या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमताही वाढेल.
रिलायन्स इनोव्हेशन कौन्सिलचे चेअरमन डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले की, पढेगा भारत जीओ टिव्ही ही संकल्पना खेड्यापाड्यातील, गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत कमी खर्चात वेगाने विस्तारणारा, मोठी व्याप्ती असणारा प्रकल्प आहे. ‘राईट टू एज्युकेशन’ नंतर आता ‘राईट एज्युकेशन’ महत्वाचे आहे. ज्ञान संवर्धनासह व्यक्ती म्हणजेच गुरु संवर्धनही आवश्यक आहे. या तंत्रज्ञानामुळे आत्मनिर्भर भारताबरोबर आता विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास येऊ लागला आहे असे डॉ. माशेलकर म्हणाले.