- वारकऱ्यांच्या सेवेसाठी शहरवासीय सरसावले; पालखीचे होणार जंगी स्वागत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२२) :- कोरोना महामारीमुळे सलग दोन वर्षानंतर होणाऱ्या आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्ताने राजाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांचा मेळा निगडीतील भक्ती – शक्ती चौकात जमा होणार आहे. ज्ञानोबा – तुकाराम असा जयघोष आणि टाळ – मृदंगाच्या गजर पुन्हा शहरवासीयांच्या कानावर पडणार आहे. पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांची सेवा करण्यास शहरवासीय सरसावले आहेत. पालखीच्या स्वागतासाठी चौक सजविण्यात आले आहेत.
दोन वर्षानंतर पालखी सोहळ्याचे आगमन शहरात होत आहे. या पार्श्वभूमीवर निगडीतील मधुकर पवळे उड्डाणपुलावरील पालखी सोहळा पेटिंग नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच भक्ती शक्ती याठिकाणी स्वागत कक्ष, स्वागत कमान आणि मंडप व स्टेज उभारण्याचे काम झाले आहे. निगडी चौकातील खांबांवर केलेल्या पेटिंगद्वारे संपूर्ण वारीचे चित्र डोळ्यासमोर उभे करण्यात आलेले आहे. यामध्ये नऊवारी घातलेल्या आणि डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या चिमुकल्या मुलींचे चित्र डोळ्याला भावते. तसेच डोक्यावर पांढरी टोपी, धोतर सदरा आणि कपाळावर गोपीचंदनाचा टिळा गळ्यात तुळशीमाळा, कपाळी बुक्का, कानाच्या दोन्ही पाळ्यांना गोपीचंदन, खांद्यावर पताका आणि टाळ – मृदुंग लक्ष वेधून घेत आहे.
आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम असतो. विठ्ठल मंदिराच्या स्वागत कमानीची रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच शहरातून थोडे पुढे आल्यानंतर आकुर्डी येथील खंडोबा चौक या ठिकाणी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी फुलांची सजावट करण्यात आली आहे. चौकात विठ्ठलाच्या प्रतिमेचे कटआऊट्स लावण्यात आलेले आहेत. त्यावर केलेली केशरी आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूच्या फुलांची सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शहरातील पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. परिसराची साफसफाई करण्यात आली आहेत.