न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२२) :- भोसरीतील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कला व वाणिज्य रात्र महाविद्यालयाचे उद्घाटन डॉ. संजीव सोनवणे (प्र. कुलगुरू सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ, पुणे) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी भोसरीचे प्रथम आमदार व संस्थेचे अध्यक्ष विलासराव लांडे, प्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील. उपप्राचार्य किरण चौधरी, राजिस्ट्रार सौ. अश्विनी भोसले चव्हाण, रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. श्रेया दाणी, उपप्राचार्या डॉ. नेहा बोरसे तसेच सर्व प्राध्यापक, प्रशासकीप कर्मचारी उपस्थित होते.
रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. श्रेया दाणी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागतपर मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ अशोक पाटील प्रास्ताविक करताना म्हणाले की, गोरगरीब विद्यार्थ्यांना काम करून शिकण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष लांडे साहेबांनी रात्र महाविद्यालय सुरू केले. शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक मोलाची कामगिरी केली.
प्रा. गणेश शिंदे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, नवीन शैक्षणिक पर्वाला संस्थेने सुरूवात केली. आपले आर्थिक, सामाजिक स्थिती बदलण्याचे सामर्थ्य शिक्षणात व ज्ञानात आहे. किती तरी मुलांना शिक्षणाची इच्छा असूनही परिस्थिती अभावी शिकता येत नाही त्यासाठी रात्र महाविद्यालय सुरू झाले.
भोसरी विधानसभेचे प्रथम माजी आमदार विलास लांडे हे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, परीसरात काम करत असताना कामगारांच्या मुलांसाठी राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली होती. या संस्थेच्या प्रगतीत महाविद्यालयातील सर्व प्राचार्य व प्राध्यापक सदैव सहकार्य करतात. त्यामुळेच संस्थेची प्रगती होते.
डॉ संजीव सोनवणे मार्गदर्शन करताना म्हणाले, भोसरीची पहिली ओळख कुस्तीची आहे. परंतु पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात चांगले कार्य निर्माण करणारे पहिले आमदार विलास लांडे आहेत की ज्यांनी बहुजनांसाठी काम करणारी राजमाता ही संस्था स्थापन केली आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख निर्माण करून स्वतः चे कर्तृत्व सिद्ध करावे. जेव्हा आपल्यात आत्मविश्वास निर्माण होत नाही, तोपर्यंत आपण यशस्वी होत नाही. सामाजिक जबाबदारीतून रात्र महाविद्यालय सुरू झाले आहे.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी यांनी आभार मानले. तर उपप्राचार्या डॉ. नेहा बोरसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सुरुवात पुणे विद्यापीठ गीताने झाली, तर वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.