- पुढील वर्षीपासून पाठ्यपुस्तकांमध्ये येणार वह्यांची जोड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२२) :- शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी पुढील वर्षीपासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची जोड देण्यात येणार आहे. एका इयत्तेला तीन पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये धडा संपल्यावर काही कोरी पाने देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना या पानांचा उपयोग वहीसारखा करता येईल. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वेगळ्या वह्या आणण्याची गरज भासणार नाही. पुढील शैक्षणिक वर्षापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली.
राज्य शिक्षण मंडळात केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी प्रधान सचिव रणजितसिंह देओल, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, शिक्षण संचालक महेश पालकर यांच्यासह उपसंचालक शिक्षणाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आगामी काळात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासोबतच शालेय शिक्षणात कौशल्य विकासावर भर देण्यासाठी काम करणार आहे. येत्या काही दिवसांत शालेय शिक्षण विभागात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसारख्या चांगल्या सुधारणा दिसतील, असे मत केसरकर यांनी व्यक्त केले.