- काय म्हणाले शरद पवार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२३) :- अजित पवार गटाने कर्जत येथे दोन दिवसीय शिबिर घेऊन आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली. तसेच या शिबिरातून शरद पवार यांच्याविरोधात आरोपांची राळ उठवण्यात आली. या आरोपांना पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये आगामी निवडणुका झाल्यानंतर अजित पवार पुन्हा परतल्यास काय करणार? या प्रश्नावर पवारांनी सूचक उत्तर दिले.
पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार परत आले आणि त्यांना माफ करून पुन्हा उपमुख्यमंत्री करण्यात आले, यावर बोलताना पवार म्हणाले, की पहाटेचा शपथविधी पक्षाच्या धोरणाचा भाग नव्हता. मात्र, तसे कुणी म्हणत असल्यास त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. सहकाऱ्यांकडून काही चुका होतात. चुका सुधारायच्या असतील, तर मोठेपणाने मोठे मन दाखवायचे असते. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी दिली. निवडणुका झाल्यानंतर अजित पवार पुन्हा तुमच्याकडे आले, तर काय निर्णय घ्याल? या प्रश्नावर भविष्यात अशीच परिस्थिती उद्भवली, तर अनुभवावरून आलेला शहाणपणा स्वीकारायचा असतो, अशा सूचक शब्दांत पवार यांनी उत्तर दिले.
राष्ट्रवादी पक्ष कुणी स्थापन केला. हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्याबाबत भाष्य करण्याची गरज नाही. तुम्ही ज्या पक्षाच्या आणि पक्षनेत्याच्या नावे मते मागितली आणि निवडून आलात. गेल्या विधानसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेऊन मते मागितली आणि याच्याशी विसंगत पाऊले टाकल्याने ते कदाचित संभ्रम निर्माण करणारे भाष्य करत असतील, अशी वेळ कुणावरही येऊ शकते, असेही पवारांनी या वेळी सांगितले.