- ‘माझे कुटुंब’च्या कामाच्या मोबदल्यापासून अद्यापही ‘त्या’ वंचित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२०) :- आपला जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजना यशस्वीपणे राबवत करोना रुग्ण शोध तसेच ज्येष्ठ नागरिक, मधुमेही व उच्चरक्तदाबासह जोखमीचे रुग्ण शोधणाऱ्या राज्यातील ७० हजार आशा कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला आजपर्यंत सरकारने दिलेला नाही.
एवढेच नव्हे तर जुलैपासून या आशांना दोन हजार रुपये मानधन देण्याचे जाहीर करून त्याचीही अमलबजावणी आजपर्यंत न करून सरकारने हजारो ‘आशा’ ची फसवणूक केली आहे. या विरोधात आता मोठा लढा उभारण्याची तयारी हजारो आशा कार्यकर्त्यांनी सुरु केली आहे.
राज्यात करोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यानंतर गावखेड्यासह शहरात व्यापक रुग्ण शोध व जनजागृती मोहीम राबविण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही संकल्पना राबवली. या काळात त्यांना पुरेसे मास्क, हातमोजे व सॅनिटाइजर ही देण्यात आले नसल्याचे आशांच्या संघटनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
दिवाळी झाली तरी मानधनाचा पत्ता नाही आणि आता १०० रुपये रोजावर कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधण्याची सक्ती केली जात आहे. या कामासाठी किमान २०० रुपये रोज द्यावे अशी आमची मागणी आहे मात्र यासाठी आम्ही काम थांबवलेले नाही, असे सांगून शंकर पुजारी म्हणाले की, माझे कुटुंबच्या कामाचा मोबदला तसेच दोन हजार रुपये मानधन सरकारने ताबडतोब न दिल्यास १५ डिसेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन केले जाईल. मागच्या युती सरकारनेही आशांची फसवणूक केली होती आणि हे सरकारही आश्वासन देऊन त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत आहे.