- मेस्टाचे जिल्हाध्यक्ष संदीप काटे यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ सप्टेंबर २०२१) :- कोरोना संक्रमणाचा धोका अटोक्यात आल्याने दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थान आदी राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात शाळा सुरू करण्यात याव्यात. घरात राहून टिव्ही आणि मोबाईल एवढेच विश्व राहिल्याने विद्यार्थ्यांची बौध्दीक वाढ खुंटत चालल्याचा दावा पालकांनी केला आहे. त्यामुळे शाळा सुरू केल्या तर विद्यार्थ्यांना घराबाहेर पडून शाळेत शिकता येईल. यासाठी राज्य सरकारने राज्यासह पुणे जिल्ह्यातील शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तथा स्टेट इंग्लिश स्कूल संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप काटे यांनी केली आहे.
यासंदर्भात काटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे राज्य शासनाने गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय योग्य ठरला असला तरी आता बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संक्रमणाचा प्रादुर्भाव अटोक्यात आलेला आहे. महाराष्ट्रात कोरोना पॉझीटिव्हीटी रेट समाधानकारकपणे घटत चाललेला आहे. अशातच टास्क फोर्सची माहिती आल्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहिर केले आहे. परंतु, राज्यातील कोरोना बाधितांची घटत असलेली संख्या पाहता शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही.
चालू आर्थिक वर्षात सर्वच शाळा व्यवस्थापकांनी शाळा सुरू करण्याची तयारी केली होती. राज्य शासनाच्या नियमांचे पालन करत शाळांच्या वर्ग खोल्या सॅनिटाईज करून घेतल्या होत्या. सर्व शिक्षक आणि इतर कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण केले होते. तरी देखील राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय दिला नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. आता विद्यार्थ्यांचे सुध्दा लसीकरण करण्यात येत आहे. शंभर टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात यावे. कोरोनाची घटती रुग्णसंख्या पाहून शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी. कारण, घरी बसून विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे, असा दावा पालकांनी केला आहे. याचा विचार करून राज्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील शाळा तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी काटे यांनी केली आहे.
राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय द्यावा
उत्तर प्रदेशमध्ये पहिली ते पाचवीचे वर्ग १ सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आले. गुजरातमध्ये इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग २ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आले. तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक, ओडिसा, उत्तराखंड, झारखंड येथे इयत्ता नव्वी ते बारावीपर्यंतचे वर्ग ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात आले. छत्तीसगडमध्ये आठवी ते अकरावी, बिहारमध्ये पहिली ते पाचवी, हिमाचल प्रदेशमध्ये दहावी ते बारावी, हरियाणामध्ये चौथी ते पाचवी, आसाममध्ये दहावी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या राज्यांच्या धर्तीवर आता महाराष्ट्रात देखील शाळा सुरू करण्याचे आदेश राज्यातील महाविकास आघाडी सरकारने द्यावेत, अशी मागणी संदीप काटे यांनी केली आहे.