- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आग्रही भूमिका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ सप्टेंबर २०२१) :- ”ओबीसी राजकीय आरक्षणाच्या संदर्भात, आज पुन्हा एकदा बैठक झाली आणि बैठकीत तत्काळ हे आरक्षण लागू झालं पाहिजे आणि जोपर्यंत आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत. अशी मागणी पुन्हा एकदा आम्ही मांडलेली आहे.” असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने राजकीय आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा ठरवून दिली आहे. आता ती मर्यादा ओलांडण्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात किंवा जे काही करायचं असेल, त्याला वेळ लागेल आणि तेवढा वेळ जर थांबलो तर ओबीसींसाठी एकही जागा शिल्लक राहत नाही. म्हणून, या दोन्ही लढाया सोबत लढल्या गेल्या पाहिजेत. आता ५० टक्क्यांच्या आतलं, किमान तेवढ्या जागा म्हणजे साधारणपणे ८५ टक्के जागा आपण समजू एकूण जागांपैकी या सुरक्षित होत आहेत.
त्या ८५ टक्के जागा ओबीसींना परत करायच्या किंवा ओबीसींना लढण्यासाठी उपलब्ध करून द्यायच्या आणि १५ टक्के जागांसाठी पुन्हा लढाई करायची. अशाप्रकारे जर केलं तर ओबीसींवर अन्याय होणार नाही. अन्यथा निवडणुका होऊन जातील आणि एकही जागा ओबीसींसाठी शिल्लक राहणार नाही.” असे फडणवीस यावेळी म्हणाले.