न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. ऑगस्ट. २०२०) :- फायनान्स कंपनी व खासगी बँका तसेच राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जाच्या हप्त्याच्या वसुलीसाठी मानसिक त्रास देण्यात येत आहे. तो रोखण्याची मागणी डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) ने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त संदीप विष्णोई यांच्यासह पुणे पोलिस आयुक्त, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, पुणे विभाग यांच्याकडे केली आहे.
कोरोनामुळे गेली पाच महिने जनता लॉकडाऊन आहे. व्यवसाय पूर्णतः बंद आहेत. असंघटित , कामगार , फेरीवाले , रिक्षावाले , महिला घर कामगार आदी मोठ्या श्रमिक वर्गास कमाई राहिलेली नाही. असे असताना कर्जाच्या व त्यांच्या हप्त्यांची परतफेड थांबलेली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( आरबीआय) ने काही दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु; त्यानंतर मागील महिन्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये पुन्हा कर्जदारांना त्रास दिला जात आहे.
परिणामी जनता नैराश्यग्रस्त झाली आहे. त्यामुळे डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया ( डीवायएफआय ) चे अध्यक्ष गणेश दराडे , सचिव डॉ. ज्ञानेश्वर मोटे, उपाध्यक्ष सचिन देसाई , अपर्णा दराडे , अमिन शेख , स्वप्नील जेवळे , अविनाश लाटकर , किसन शेवते, कडुलकर यांनी वसुलीसाठी होणारा त्रास थांबवावा अशी मागणी केली आहे.