न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२०) :- राज्यातील शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या सत्राच्या अखेरच्या टप्प्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. विद्या प्राधिकरणातर्फे ऑक्टोबरपासून हा कार्यक्रम होणार आहे.
विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर पाटील म्हणाले, की नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यासाठी दूरदर्शनकडून ऑक्टोबरपासून वेळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या प्रसारणाची वेळ वगैरे तपशील स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. शैक्षणिक कार्यक्रमांचे काही भाग तयार करण्यात आले आहेत. तसेच पुढील भागांसाठीचे चित्रीकरणही सुरू आहे.
दूरदर्शनवरील कार्यक्रमांमध्ये पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम सुरू करण्यात येतील. त्यानंतर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीही कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.