न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२४) :- वाढत्या थकबाकीमुळे इंदोरी ग्रामपंचायत प्रशासनाने दोन हजार रुपयांपेक्षा अधिक पाणीपट्टी थकीत असलेल्या ४०० थकबाकीदारांचे नळजोड तोडण्याची मोहिम तीव्र केली आहे. यामुळे करवसुलीचे प्रमाण वाढले आहे. मार्च अखेर ग्रामपंचायतीला ५४ टक्के करवसुली करण्यात यश आले आहे.
इंदोरी ग्रामपंचायतीचे एकूण मिळकत करदाते २ हजार ३६० आहेत. मात्र अपेक्षित करवसुली होत नसल्याने ग्रामपंचायतीचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित होण्याची नेहमी टांगती तलवार राहत असते. आत्तापर्यंत कमाल ५० टक्के पर्यंत करवसुली होत असते. दोन हजार रुपयांपेक्षा अधिक पाणीपट्टी थकीत असणाऱ्या थकबाकीदारांचे नळजोड तोडण्यास ग्रामपंचायतीने सुरुवात केली.
या कारवाईमुळे करवसुलीची टक्केवारी वाढली आहे. अपेक्षित करवसुली होत नसल्याने ग्रामपंचायतीस नियमित वीज बील भरणे कठीण होत आहे. अनेकदा वीज खंडीत होण्याच्या संकटास तोंड द्यावे लागते. कॅडबरी कंपनीकडून भेट म्हणून उभारल्या जाणाऱ्या सौर उर्जा प्रकल्पामुळे हा प्रश्न सुटण्यास मदत होईल.