अतिमहत्वकांक्षेमुळे बसू शकतो फटका?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२४) :- खेडेगावे एकत्रित होऊन पिंपरी- चिंचवड शहर बनले. त्या काळापासून सुरू असलेले गावकी आणि भावकीचे नाते तसेच, पाहुणे मंडळीचा गोतावळा अद्याप टिकून आहे. महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत या स्थानिक पातळीवरील निवडणुकीत त्याचा मोठा प्रभाव दिसून येतो.
झपाट्याने विस्तारलेल्या पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. असे असले तरी, विधानसभा आणि लोकसभा या राज्य व केंद्रस्तरावरील निवडणुकीत पडसाद उमटताना दिसतात. आताची निवडणूकही नातेगोत्यांच्या गोतावळ्यातच फिरताना दिसत आहेत. शिवसेनेचे (ठाकरे गट) वाघेरे पाटील यांनी नात्या-गोत्यांवर भर दिल्याने शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या समोर आव्हान उभे केले आहे. पूर्वी सहज वाटणारी निवडणूक बारणेंसाठी सोपी नसल्याचे आतापर्यंतच्या आरोप-प्रत्यारोपातून पहावयास मिळत आहे.
पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ तालुक्यात स्थानिकांचा शेती, दुग्धपालन हा मुख्य व्यवसाय आहे. त्यात हॉटेल, रेस्टॉरंट, बांधकाम, मंगल कार्यालय आदी नवीन उद्योगांची भर पडली आहे. गावाचे रूप बदलून अत्याधुनिक स्वरूप आले आहे. स्थानिकांचा प्रभाव, नातेगोते, गावकी-भावकी, स्थानिक अर्थकारण परिसरात वरचढ आहे. स्थानिकांनी विविध व्यवसाय व धंद्यावरील पकड कायम ठेवल्याने त्यांचा दबदबा कायम आहे. गावपण कमी झाले असले तरी, नातेगोते आणि पाहणेसंबंध जपले जातात. कितीही वाद असला तरी निर्णायक क्षणी तो मिटवून एकीचा संदेश दिला जातो. हे अनेक निवडणुकीतून दिसून आले आहे. महापालिका,नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिकांचे वर्चस्व अद्यापही अबाधित आहे. नात्यागोत्याची ही वीण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत पोहचली आहे. कौटुंबिक मुद्दे पुढे करून भावनिक सादही घातली जात आहे.
मतदारसंघात संजोग वाघेरे यांचे नातेगोते मोठे आहे. महाविकास आघाडीतील पक्ष संघटनासोबतच पिंपरी, चिंचवड व मावळ तालुक्यातील नातेगोते माझ्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर, या निवडणुकीत नातेगोते महत्त्वाचे नसून, देशाचे मुद्दे महत्त्वाचे असल्याचे उत्तर बारणे यांनी दिले आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे. या वादात देशासह राज्याचे मोठे प्रश्न काहीसे बाजूला पडले आहेत. शहर टोलेजंग इमारती, उड्डाणपूल, उद्याने तसेच, मेट्रो, बीआरटीएस आदींमुळे स्मार्ट सिटी बनली आहे. असले असली तरी, बहुतांश ग्रामस्थ आपली शेती, बैलजोड, परंपरा तसेच, जोडधंदा अद्याप कायम ठेऊन आहेत. काहींनी आपल्या जमिनी राखून ठेवल्या आहेत.
तीच स्थिती मावळ तालुक्यात आहे. निवडणुकीच्या वेळी तसेच, संकट समयी सर्व ग्रामस्थ एकत्र येतात. वादविवाद आणि भांडणे बाजूला सारून कट्टर वैरी एक होतात. गावाने ठरवलेल्या उमेदवाराला संपूर्ण गावाचा एकमुखी पाठींबा दिला जातो. तो कोणत्या पक्षाचा की संघटनेचा की अपक्ष याचा विचार केला जात नाही, एकदा निर्णय घेतला की तो बदलला जात नाही. गावाच्या एकीसमोर अनेकदा राजकीय गणिते फिकी पडतात. पुणे शहराप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय पक्षाचा थेट प्रभाव व हस्तक्षेप चालत नाही. नेतेमंडळीची पिंपरी- चिंचवड शहराच्या राजकारणावर पकड असली तरी, स्थानिकांचा मदतीशिवाय ती घट्ट होऊ शकत नाही. ग्रामस्थ मंडळी गावकी-भावकीच्या राजकारणात अग्रेसर आहेत. स्थानिकांच्या प्रभावामुळे मतांचे गोळाबेरीज विजयाचा मार्ग सुकर करते. तसेच, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातून नोकरी धंद्यासाठी शहरात अनेक कुटुंब वसलेली आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा, जैन, ब्राह्मण, ख्रिश्चन, ओबीसी, आंग्री-कोळी, मुस्लिम, अनुसूचित जाती व जमाती या समाजातील मतदारांची संख्या अधिक आहे.
भाजपा बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या एका नेत्याने काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना हु इज धंगेकर, असा प्रश्न केला होता. तो मुद्दा विरोधकांनी उचलून धरला. त्याचा फटका भाजपाला बसला आणि धंगेकर हे निवडून आले. त्या पराभवाची चर्चा राज्यभर झाली होती, त्याच प्रकारचे वक्तव्य मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी या निवडणुकीत नातेगोते महत्त्वाचे नसून, देशाचे मुद्दे महत्त्वाचे असल्याचे उत्तर बारणे यांनी दिले आहे. त्यामुळे त्याचा फटका बारणे यांना बसू शकतो. महायुतीतील शिवसेनेचे (शिंदे गट) श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात मित्रपक्षाचे आमदार तसेच, प्रमुख पदाधिकारी दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपाचे पदाधिकारी आणि आमदार बारामती, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदार संघात प्रचार करीत आहेत. त्यांचा फटका बारणे यांना बसू शकतो.