- भाजपचे अनुप मोरे आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांची आयुक्तांकडे मागणी….
- उड्डाणपुलाचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२०) :- निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलाचे काम कासव गतीने सुरू आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून पुलाचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात यावे. तत्पुर्वी, पुलाचे काम अर्धवट स्थितीत असताना पुलावरील पुणे-मुंबई लेन वाहतुकीसाठी खुली करण्याची घाई करू नये, अशी मागणी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे आणि माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजा मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुणे-मुंबई महामार्गावर निगडी भक्ती-शक्ती समुह शिल्पासमोर उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. पुलाचे काम अद्याप अर्धवट स्थितीत आहे. पुणे-मुंबई लेनचे काम पूर्ण झाल्याचे दाखवून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे पालिका प्रशासनाच्या विचाराधीन असल्याचे दिसते. वास्तवीक पाहता पुलाचे काम पूर्ण झालेले नसताना केवळ पुणे-मुंबई लेन सुरू करण्याचा हट्ट धरणे चुकीचे आहे. पुलाची ही लेन वाहतुकीसाठी खुली केली तर उद्या घातपात होण्याची शक्यता आहे. एखाद्याचा अपघात झाला तर त्याला कोण जबाबदार राहणार ?, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने पुलावरून वाहतूक सुरू करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्यावा.
भक्ती-शक्ती चौकातील उड्डाण पुलाच्या कामाला दोनवेळा मुदतवाढ देऊन देखील अद्याप काम पूर्ण झालेले नाही. या कामासाठी ९० कोटी ५३ लाख एवढा खर्च होत आहे. पुलाच्या कामासाठी भक्ती-शक्ती चौक बंद केल्याने वाहतूक रूपीनगर व प्राधिकरणातून वळविली आहे. वाहनचालकांना सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतराचा वळसा मारावा लागत आहे. त्यामुळे नागरवस्तीमध्ये अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. नागरी भागात अवजड वाहने येत असल्याने प्राधिकरणातील नागरिक त्रस्त झाले आहेत. पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांची यातून सुटका करावी, असे या पत्रकात उपाध्यक्ष अनुप मोरे आणि माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजा मोरे यांनी म्हटले आहे.
”भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाचे काम सध्या अर्धवट स्थितीत आहे. अशा स्थितीत पुणे-मुंबई मार्गाची लेन सुरू करणे धोकादायक ठरेल. त्यामुळे ही लेन वाहतुकीसाठी सुरू करण्याची घाई न करता, प्रथम पालिका प्रशासनाने पुलाचे काम पूर्ण करावे. पुलाचे उद्घाटन भाजपचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते घेण्यात यावे. त्यानंतरच पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करावा”.
– मा. अनुप मोरे (प्रदेश उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा)