- माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी केवळ ५० जणांना मंदिरात प्रवेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२०) :- संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त (कार्तिक सोहळा) अलंकापुरी अर्थात आळंदीत रविवार (दि. ६) ते मंगळवार (दि. १५) पर्यंत येणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी करून संचारबंदी लागू करण्याचा आदेश, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त मंच्चाक इप्पार यांनी दिली.
माऊलींचा समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत कार्तिक सोहळा रंगणार आहे. त्याची सुरुवात मंगळवार (दि. ८) ते सोमवार (दि. १४) पर्यंत चालणार आहे. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्याप्रसंगी गर्दी होवू नये म्हणून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडून पंढरपूरच्या धर्तीवर संचारबंदी लागू करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
वारकऱ्यांच्या आरोग्याची दक्षता घेण्यासाठी मंदिरात थर्मल स्कॅन करून प्रवेश दिला जाईल. देऊळवाड्यात मंगळवारी गुरू हैबतबाबा पायरीपूजनासाठी ३० जणांना परवानगी आहे. माऊलींच्या समाधीवरिल महापूजा आणि दर्शन लाईव्ह स्वरूपात सोशल मीडिया आणि चॅनलद्वारे दाखविले जाणार आहे. तसेच सोहळा काळात ५०० ते ६०० वारकऱ्यांना दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, जिल्हाधिकारी देशमुख यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. कार्तिकी एकादशी शुक्रवारी (दि. ८) पहाटपूजेकरीता आणि माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी ५० जणांना मंदिर प्रवेश राहिल. किर्तन जागरला साथ देण्यासाठी १५ टाळकरी परवानगी आणि परंपरेने सेवा करणाऱ्या कुटुंबातील पाच व्यक्तींनाच प्रवेश आहे. सेवा झाली की लगेच माघारी फिरावे लागणार आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
आळंदीसोबतच चऱ्होली खुर्द, केळगाव, चिंबळी, वडगाव घेनंद, कोयाळी, धानोर, सोळू, मरकळ आणि पिंपरी महापालिका हद्दीतील चहोऱ्होली बुद्रुक, डुडुळगाव या गावांमध्ये अत्यावश्य सेवा वगळता इतरांना संचारबंदी आहे. संचारबंदी काळात हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळेत रहिवास करण्यास पूर्ण बंदी आहे. तर अगोदर जे राहण्यास आहेत, त्यांना बाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.