न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२०) :- केंद्रीय प्रवेश समितीमार्फत पुणे व पिंपरी चिंचवडमधील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेतील पहिली फेरी काही दिवसांपुर्वीच पुर्ण झाली होती. पण मराठा आरक्षणासंदर्भातील उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये दि. ९ डिसेंबरपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे.
पहिल्या फेरीमध्ये एकुण ३० हजार ५४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. दुस-या फेरीत एकुण ६० हजार ५९९ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ४६ हजार ७१४ विद्यार्थ्यांचे अर्ज आले. त्यातून गुणवत्तेनुसार २३ हजार १२० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे.
त्यामध्ये १० हजार ८९ विद्यार्थी विज्ञान शाखेतील तर ९ हजार ७६२ विद्यार्थी वाणिज्य शाखेतील आहेत. एकुण अर्जांपैकी ५० टक्के विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार पहिल्या पसंती दिलेल्या ८ हजार ९२९ विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे.