- राजशिष्टाचारावरून राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीला नगरसेवक शैलेश मोरेंचा सवाल..
- लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या राष्ट्रवादीने आधी जनतेची माफी मागावी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील रावेत, बोऱ्हाडेवाडी आणि चऱ्होली या तीन ठिकाणी महानगरपालिका पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधणार असून, त्याची चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोडत काढली जाणार होती. मात्र, शहर राष्ट्रवादीच्या हट्टी व अतिरेकीपणाला बळी पडून पालिका आयुक्तांनी राजशिष्टाचाराचे कारण देत ही सोडत अचानक रद्द करून लोकशाहीचा गळा घोटला आहे, अशी टीका भाजप नगरसेवक शैलेश मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
पंतप्रधान आवास योजनेच्या सोडतीसाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या आवारात दुपारपासून हजारो नागरिक जमा झाले होते. ऐनवेळी राजशिष्टाचाराचे पालन झाले नाही म्हणून ही सोडत रद्द केली. हे काही व्यवहारिक कारण नाही. सर्वसामान्य जनता आपल्या हातातली कामे सोडून सोडतीसाठी हजर होती. ती केवळ टाईमपास म्हणून या सोडतीच्या कार्यक्रमाला आलेली नव्हती. या महानगरात घराचे दिवास्वप्न पाहणाऱ्या जनतेचा राष्ट्रवादी व पालिका प्रशासनाने भ्रमनिरास केला आहे. त्यांनी सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आहे.
भाजपने सर्वसामान्य जनतेचे घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी आवास योजना आणली. त्याची अंमलबजावणी होत आहे. मात्र, आमंत्रण-निमंत्रणावरून राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीला त्यातही राजकारण करायचे आहे. राष्ट्रवादीला जनता प्यारी आहे का पक्षाचे नेतेमंडळी? याचा त्यांनी आधी खुलासा करावा. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या राष्ट्रवादीने आधी जनतेची माफी मागावी, अन्यथा आगामी निवडणुकीत जनता त्यांना पुन्हा बाहेरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे नगरसेवक शैलेश मोरे यांनी या पत्रकात म्हटले आहे.