- बालकांचे आर्थिक व मालमत्ताविषयक हक्कही अबाधित ठेवणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२१) :- कोरोनामुळे दोन्ही पालका गमावलेल्या बालकांसाठी प्रशासनाकडून गृहभेटी सुरू आहेत. या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
तसेच बालकांचा सर्व्हे गतीने करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
डॉ. देशमुख म्हणाले, कोरोनामुळे ज्या बालकांचे पालक दगावले आहेत, अशा बालकांना बाल संगोपन योजनेअंतर्गत मदत मिळावी म्हणून कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. अशा बालकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांचा सांभाळ योग्य रीतीने होतो किंवा नाही यासाठी गृहभेटी द्याव्यात. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वतोपरी संरक्षण देणे ही आपली जबाबदारी आहे. बालकांची सर्वतोपरी काळजी घेण्यासोबतच बालकांचे आर्थिक व मालमत्ताविषयक हक्क अबाधित राहतील याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी यंत्रणेला दिले.