- भोसरीतील जश्ने ईद-ए-मिलन कार्यक्रमाला पवारांची हजेरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे २०२२) :- छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘ भोसले ‘ नावाने राज्य निर्माण केले नाही. त्यांनी महाराष्ट्रात सर्वसामान्यांचे म्हणजेच रयतेचे राज्य उभे केले. त्या महाराष्ट्रात सध्या द्वेष आणि भांडणे पेटविण्याचे प्रकार सुरू आहेत. प्रगत महाराष्ट्र रोजगार, विकास व प्रगतीच्या माध्यमातून नागरिकांचे हित साधत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी बुधवारी (दि. ११) भोसरी येथे केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भोसरीत आयोजित जश्ने ईद-ए-मिलन या राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, केरळ राज्याचे पदाधिकारी तसेच आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, योगेश बहल, कविता आल्हाट, राजू मिसाळ व विविध धर्माचे धर्मगुरू उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, देशात मोघल-यादव यांनी आपल्या नावांनी राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य नागरिकांना संघटीत केले. आत्मसन्मान वाढविला. लोककल्याणाचे राज्य निर्माण केले. सध्या राज्यात द्वेष भांडणे पेटविण्याचे प्रकार सुरू आहेत. छत्रपतींच्या महाराष्ट्राला हे नको आहे. त्यांना रोजगार आणि विकास हवा आहे. कोणत्या एक धर्म व जातीचे राज्य नको असून, प्रगतीशील महाराष्ट्र हवा आहे. पिंपरी – चिंचवड हे मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते. येथे सर्व जातीधर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. बंधूभावाचा विचार या कार्यक्रमातून राष्ट्रवादीने दिला आहे. ते एक आदर्श उदाहरण आहे.