- पालिकेची नवीन प्रभाग रचना शहर राष्ट्रवादीला अनुकूल?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२२) :- सन २०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत मोदी लाट, राज्यात असलेली भाजपाची सत्ता आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अतिआत्मविश्वासामुळे राष्ट्रवादीला सत्तेतून हद्दपार व्हावे लागले होते. या वेळी मात्र, महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवायचीच या उद्देशाने कामाला लागलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला रोखण्याची रणनीती तयार केली आहे.
चिंचवड आणि भाजप विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या काही आजी आणि माजी नगरसेवकांना आणून भाजपविरोधात पक्षात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सन २००२ ते २०१७ या कालावधीत शहरात मोठी विकासकामे झाली हे विरोधकही नाकारत नाहीत. विकासकामांच्या जोरावर महालिकेत आपण पुन्हा सत्तेत नक्की येऊ या अतिआत्मविश्वासात वावरणाऱ्या राष्ट्रवादीला २०१७ च्या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले होते. तर महापालिकेतील या पक्षाचे संख्याबळही निच्चांकी पातळीवर पोहोचले होते.
मोदी लाट, भाजपचा वाढलेला प्रभाव, भोसरी आणि चिंचवडच्या आमदारांनी निवडणुकीवर घेतलेली पकड त्यातच राष्ट्रवादीच्या ताकदिवर आजी – माजी नगरसेवकांनी अचानक भाजपमध्ये केलेला प्रवेश यामुळे दारुण पराभवाचा सामना राष्ट्रवादीला करावा लागला होता. या वेळी राष्ट्रवादीने सुरुवातीपासूनच सावध पवित्रा घेतल्याचे पहावयास मिळत आहे. अध्यक्षपदाची झालेली खांदेपालट, जुन्या व नवख्यांचा घातलेला मेळ तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात घातलेले लक्ष या बाबी राष्ट्रवादीसाठी सकारात्मक मानल्या जात आहेत. त्यातच राज्यात असलेली सत्ता भाजपने गेल्या पाच वर्षांत केलेल्या अनेक चुका, वारंवार होत असलेले भ्रष्टाचार, लाचखोरी आणि खंडणीखोरीचे आरोप यामुळे भाजप सध्यातरी विस्कळीत पहावयास मिळत आहे. भाजप नेत्यांनी शंभर पारचा नारा दिला असला तरी पन्नासच्या आतच भाजपला रोखण्याची यशस्वी खेळी राष्ट्रवादीकडून खेळली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी केलेली प्रभागरचनाच कायम राहिली असल्याने राष्ट्रवादीला त्याचाही फायदा होणार आहे. राष्ट्रवादीसाठी ही प्रभागरचनाच मोठे यश मिळवून देण्यासाठी हातभार लावण्याची शक्यता आहे. भाजपच्या तगड्या उमेदवारांच्या प्रभागाचे झालेले तुकडे, एकगठ्ठा मतांमध्ये झालेली विभागणी आणि अनेक प्रभागात नवख्या उमेदवारांवरच भाजपला भर द्यावा लागणार असल्याने ते देखील राष्ट्रवादीच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता आहे.