न्यूज पीसीएसमी नेटवर्क
पीटीआय, बर्मिगहॅम (दि. ०६ ऑगस्ट २०२२) :- भारतीय कुस्तीगीरांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी पदकसंख्येत चार पदकांची मोलाची भर घातली. ऑलिम्पिक पदक विजेत्या बजरंग पुनिया (६५ किलो), दीपक पुनिया (८६ किलो) आणि साक्षी मलिक (६२ किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले, तर अंशु मलिकला (५७ किलो) रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
बजरंग पुनियाने ६५ किलोच्या अंतिम लढतीत आक्रमक खेळ केला. त्याचवेळी कॅनडाचा प्रतिस्पर्धी लाच्लान मॅकनिलकडून सातत्याने पायावर होणारे आक्रमण बजरंगने चपळता दाखवून प्रत्येक वेळेस परतवून लावले. निर्णायक विजय मिळवून अंतिम फेरीत आलेल्या बजरंगने सुवर्ण लढतीत अखेरीस ९-२ असा विजय मिळवला.
बजरंगपाठोपाठ साक्षी मलिकने भारताला कुस्तीमधील दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. साक्षीला सुवर्णपदकाच्या लढतीत मात्र कॅनडाच्या अॅना गोन्झालेसविरुद्ध पहिल्या फेरीत ०-४ असे पिछाडीवर राहावे लागले होते. मात्र, दुसऱ्या फेरीत सुरुवातीलाच दुहेरी पट काढून साक्षीने दोन गुणांची कमाई केली आणि नंतर धोकादायक स्थितीत आलेल्या क्षणाचा फायदा उठवून गोन्झालेसला चितपट करून सुवर्णपदक मिळवले.
महिला विभागातील ५७ किलो लढतीत अंशू मलिकला नायजेरियाच्या ओडुनायो अॅडेकुओरोयेचे आव्हान पेलवले नाही. अंशूला सुवर्णपदकाच्या लढतीत ओडुनायोकडून ३-७ असा पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या ८६ किलो वजनी गटात भारताच्या दीपक पुनियाने पाकिस्तानच्या मुहम्मद इनामविरुद्ध ३-० अशी बाजी मारली.