- तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळे तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास होणार मोठी अडचण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जानेवारी २०२२) :- महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या ३० संघटनांनी हा संप पुकारला आहे. तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळे राज्यातील इतर भागात तांत्रिक बिघाड झाल्यास, मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरणचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आज ३ जानेवारी २०२३ रोजी मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. महावितरण कर्मचाऱ्यांकडून तीन दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. महावितरणचे खासगीकरण करण्याच्या विरोधात ही संपाची हाक देण्यात आली आहे. गरज पडल्यास हा राज्यव्यापी संप तीन दिवसांनंतरही सुरु ठेऊ, अशी भूमिका माहावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
महावितरणचे खासगीकरण केले जाणार आहे. अदानी कंपनीने समान वीज वितरणासाठी परवानगी मागितली आहे. तसेच यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकार अदानी समूहाला वीजवितरणाचा परवाना देण्याची शक्यता आहे. अदानी कंपनीला कोणत्याही परिस्थितीत वीज वितरणाचा परवाना मिळू नये, ही या संपकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. या संपात राज्यातल्या ३० संघटना सहभागी होणार आहेत. दरम्यान या काळात वीजपुरवठा करण्याची जबाबदारी ही वरिष्ठ अधिकारी आणि सरकारची असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप महावितरण कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान राज्य सरकारने मेस्मासारखा कायदा लागू केला तर ठिगणी उडेल. त्यामुळे महावितरणने संप मागे घ्यावा अशी प्रतिक्रिया महावितरणाचे संचालक विश्वास पाठक यांनी दिली आहे.
















