न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नवी दिल्ली (दि. २५ फेब्रुवारी २०२३) :- महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामांतराचा मुद्दा अखेर निकाली निघाला आहे. कारण राज्य शासनाच्या नामांतराच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. त्यामुळं आता औरंगाबादचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचं नामांतर ‘धाराशीव’ असं झालं आहे.
या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे दिली आहे. त्यांनी म्हटलं, “राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी! पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वातील सरकारनं करुन दाखविले…”
फक्त शहराचं नाव बदललं जिल्ह्याचं नाव कायम…
केंद्राच्या आदेशानुसार, औरंगाबाद जिल्ह्याच्या मुख्यालयाचं नाव छत्रपती संभाजी नगर करण्यात आलं आहे. पण औरंगाबाद जिल्ह्याचं नाव कायम राहणार आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्याच्या मुख्यालयाचं नाव धाराशीव असं बदलण्यात आलं आहे. पण उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव कायम ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासकीय कामकाज आहे त्या नावानेच होणार असेल तर नाव बदलून फायदा काय अशी चर्चा लोकांमध्ये सुरु आहे.












