- आ. प्रणिती शिंदेंचा पिंपरीत भाजपा आणि आरएसएसवर घणाघात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च २०२३) :- वातावरण विरोधात होत चालले की हे कांड करतात. ठिकठिकाणी पेटवापेटवीचं राजकारण आणि जातीयवाद पसरवतात. निवडणूक कशी जिंकायची याकडे ते बघत असतात. महिलांकडे आता वस्तू म्हणून पाहिलं जात आहे. हे आधी कधीच घडलेले नाही. हा देश पुरोगामी, साधू, संतांच्या विचारांचा आहे. परंतु, भाजपा मात्र महिलांचा नेहमी अपमान करत आहे. त्यांना वरिष्ठ नेते पाठीशी घालतायत. भाजपा आणि आरएसएसची विचारसरणी ही महिलांच्या विरोधातील आहे. महाराष्ट्रात दबावाचे सरकार आहे लोकशाहीचे नाही, असा आरोप काँग्रेसच्या नेत्या आमदार प्रणिती शिंदेंनी भाजपावर केला आहे.
आज शुक्रवारी (दि. ३१) रोजी सकाळी ११ वाजता पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांची पत्रकार परिषद मोरवाडी, पिंपरी येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे त्या म्हणाल्या की, काँग्रेस, राहुल गांधी आणि आम्हाला सावरकर यांची विचारसरणी पटत नाही. प्रत्येक पक्षाची एक विचारासरणी असते. एकेकाळी आरएसएस आणि भाजपाला महात्मा गांधींची विचारसरणी पटत नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे पण त्यांच्या विरोधात सावरकर यांनी लिहिले हे इतिहासात पाहायला मिळतं. काँग्रेसची केंद्रात सत्ता होती तेव्हा ईडी, सीबीआय यांच्यावर दबाव टाकला नाही. पण सध्या आपण महाराष्ट्रात देशात काय चालल आहे ते पाहत आहोत. भारत जोडो यात्रा ही राजकीय हेतूने काढली नाही. आम्ही सत्तेसाठी नव्हे तर हुकूमशाही, आणि दाबावाच्या राजकारणाविरोधात लढतो आहोत. आम्हाला लोकशाही जिवंत ठेवायची आहे.