न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२३) :- गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रता प्रकरणाची नियमित सुनावणी विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे. या सुनावणीत अनेक दावे- प्रतिदावे, आरोप केले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. मात्र, दिलेल्या मुदतीत निकाल देणे कठीण असून, यासाठी वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या वकिलांशी चर्चा केली असून अधिवेशन काळातही सुनावणी घेऊ तर वेळ पडल्यास २१ व २२ डिसेंबर रोजी नागपुरातही सुनावणी घेण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. एकीकडे आमदार अपात्रताप्रकरणाची नियमित सुनावणी होत असताना दुसरीकडे विधिमंडळाचे कामकाज असणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासाठी मुदतीत सुनावणी घेऊन निर्णय घेणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. हे सर्व करताना राहुल नार्वेकर यांची तारेवरची कसरत होणार आहे. ओव्हरटाइम करावा लागणार आहे. विधिमंडळाचे दैनंदिन कामकाज आटोपल्यानंतर सायंकाळी आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी घेतली जाऊ शकते, असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे. आताच्या घडीला सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवली जात आहे. यानंतर सचिव विजय जोशी यांची साक्ष नोंदवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यापासून शिंदे गटाच्या नेत्यांची उलट साक्ष घेतली जाणार आहे. यामध्ये भरत गोगावले, उदय सामंत, दिलीप लांडे आणि राहुल शेवाळे यांचा समावेश असल्याचे समजते.
आमदार अपात्रता प्रकरणात दिरंगाई होत असल्याचा आरोप ठाकरे गटाचा आहे. ठाकरे गटाचे आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवली जात आहे. यामध्ये शिंदे गटाच्या वकिलांकडून अनेक प्रकारचे प्रश्न प्रभू यांना विचारले जात आहे. तर २१ जून २०२२ च्या ठरावाबाबत केलेला दावा सुनील प्रभू यांनी फेटाळला आहे.