- आळंदी येथे हराळे वैष्णव धर्मशाळेच्या वतीने आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२३) :- वारकरी भूषण, समाज भूषण, समाजरत्न पुरस्कार प्रधान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा (आळंदी देवाची) या संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आळंदी देवाची येथील समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर रविवारी (दि. 10) दुपारी दोन वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सन्मान सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळेच्या वतीने विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आळंदी येथे कार्तिकीवारीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा उत्सव सुरू आहे. या उत्सवासाठी महाराष्ट्राचा देशभरातील वारकरी भाविक भक्त आळंदीमध्ये दाखल झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा हा महाराष्ट्राच्या भारताच्या इतिहासातील प्रमुख सोहळा असून या सोहळ्याच्या निमित्ताने समस्त समाधर्माच्या आळंदी देवाची संत ज्ञानेश्वर मंदिरासमोर दरवर्षीप्रमाणे मोठा उत्सव व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. या वर्षी देखील हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून वारकरी भूषण, समाज भूषण आणि समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष व कष्टकर्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही कांबळे यांनी केले आहे.
कष्टकर्यांचे नेते बाबा कांबळे यांची नुकतीच संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमात अभ्यूदय बँकेचे माजी अध्यक्ष संदीप घनदाट यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. शिवाजी भगत यांना वारकरी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या बरोबरच सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ तांदळे यांना समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच शिक्रापुरचे सरपंच रमेश गडदे, उद्योजक महेंद्र निघोजकर, नंदकुमार सोनवणे, सुरेश कानडे यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे. या बरोबरच सानिका आबनावेचा विशेष पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात येणार आहे.