- देशात पहिल्या दहा क्रमांकामध्ये येण्यासाठी विशेष प्रयत्न करणार – निवेदिता घार्गे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. १६ जानेवारी २०२४) :- स्वच्छ भारत अभियानांतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ झालेल्या स्पर्धेत देहू नगरपंचायतीने देशात ७१७ वा तर राज्यात १५३ वा क्रमांक पटकावला आहे. गतवर्षी राज्य पातळीवर ३६७ व्या क्रमांकावर देहु नगरपंचायत होते. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसादामुळे सांघिक प्रयत्न व नावीन्यपूर्ण प्रकल्पाच्या अंतर्भावामुळे यंदा १५३ वा क्रमांक मिळाला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण करण्यासाठी वर्षभरामध्ये शासनाचे तीन पथक येत असतात. हागणदारी मुक्त आणि कचरा मुक्त शहराची पाहणी करूनच क्रमांक दिले जातात. स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा’ अभियान सन २०२४-२५ अंतर्गत ओला व सुका कचरा वर्गीकरण व प्रक्रिया करून परिसर कचरा मुक्त करणे, पर्यावरण प्रदूषण मुक्त राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे, तसेच परिसरात प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे.
तसेच नागरिकांनी कचरा इतरत्र टाकू नये, ओला व सुका कचरा वर्गीकरण करून घंटागाडीतच टाकावा. परिसर स्वच्छ ठेवणेयासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानामध्ये देशात देहू नगरपंचायतीचे नाव उंचावण्यासाठी सर्व ग्रामस्थ व नागरिकांना सहकार्य करण्याचे नगरपंचायतीच्या वतीने आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायत प्रशासन दिली आहे.
नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक, नगरसेविका, नगरपंचायतीचे सर्व अधिकारी, सफाई कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे यंदा १५३ वा क्रमांकावर आहे. देहू नगरपंचायतीचे मान उंचवण्यासाठी आगामी वर्षभरामध्ये देशात पहिल्या दहा क्रमांकामध्ये येण्यासाठी विशेष प्रयत्न असणार आहे.
– निवेदिता घार्गे, मुख्याधिकारी, देहू नगरपंचायत…