- मातंग समाजाचे नेते अमित गोरखे यांची भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२४) :- महाराष्ट्र अनुसूचित जाती जमातीमध्ये हिंदू मातंग समाज लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर असून जन्मापासूनच हिंदू असल्याचा अभिमान हा समाज बाळगून आहे. महाराष्ट्रात मातंग समाजाची ताकद जास्त असूनसुद्धा आजवर कुठल्याही पक्षाने मातंग समाजाला राज्यसभा अथवा विधान परिषदेवर संधी दिलेली नाही.
पुढील महिन्यात रिक्त होणाऱ्या राज्यसभेतील सहा जागापैकी महाराष्ट्रातील जागेवर मातंग समाजातील कुठल्याही नेत्याचा विचार करून मातंग समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी मातंग समाजाचे नेते तथा अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
त्यांच्या मागणीनुसार मातंग समाजातील कुठल्याही नेतृत्वाला अशी संधी कुठल्याच पक्षाने दिलेली नाही, ती संधी हिंदू मातंग असलेल्या या समाजाला भाजपाने द्यावी. भाजपा हा खऱ्या अर्थाने सर्व स्तरातील समाजाचा न्याय देणारा पक्ष आहे, त्यामुळे या मागणीचा विचार भारतीय जनता पार्टी नक्की करेल, असा विश्र्वास वाटतो, असे पत्रात अमित गोरखे यांनी नमूद केले आहे.