न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे. २०२०) :- संचारबंदीमुळे सलग तीन सर्वसाधारण सभांना गैरहजर राहिल्याने अनेकांच्या नगरसेवकपदास धोका निर्माण झाला होता. परंतु, विधी समितीने गैरहजर नगरसेवकांची रजा मंजूर केल्याने नगरसेवकपदास निर्माण झालेला धोका टळला आहे.
शासनाने संचारबंदी लागू केल्याने मार्चपासून मे महिन्यांपर्यंत एकही सर्वसाधारण सभा झालेली नाही. मार्च आणि मे महिन्यांची सभा गणसंख्येअभावी तहकूब झाली. महापालिका नियमानुसार सलग तीन सभांना गैरहजर राहिल्यास नगरसेवकपद रद्द होऊ शकते.
तसेच, विविध विषय समितीच्या बैठका सलग ३ महिने न झाल्यास सभापतीपद जाऊ शकते. दरम्यान, सलग ३ सभांना गैरहजर राहिलेल्या नगरसेवकांवर कारवाई होऊ नये म्हणून विधी समितीकडून नगरसेवकांची रजा मंजूर करून घेण्यात आली आहे. दरम्यान, स्थायी समितीसह इतर विषय समिती सभापतींनी मोजक्या अधिकाऱ्यांसोबत साप्ताहिक सभा घेण्यास सुरुवात केली आहे.