न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. सप्टेंबर. २०२०) :- समृद्ध जीवन फूड्स इंडिया कंपनीने केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषणने ( सीआयडी ) गेल्या ५ वर्षापासून फरार असलेल्या दोघा संचालकांना अटक केली आहे. ऋषकेश वसंत कणसे ( वय ३० ) आणि सुप्रिया वसंत कणसे ( वय ३६, रा. पुणे ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या कंपनीने ३ हजार ७०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांना गुरुवारी विशेष न्यायालयात हजर केले न्यायालयाने अधिक असताना तपासासाठी ७ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
समृद्ध जीवन फूड्स इंडिया व समृद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टिपर्पजच्या को – ऑप . सोसायटी कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात राज्यात ४ गुन्ह्यांचा तपास सीआयडी करीत आहेत. या कंपन्यांविरोधात देशातील अनेक राज्यांत गुन्हे दाखल असून गुन्हा दाखल झाल्यापासून हे संचालक फरार होते. कंपनीने पशुधन विक्री, संगोपन व खरेदी पुन्हा खरेदी यासारख्या विविध आकर्षक, उच्च परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजना सुरु केल्या. त्याकरिता प्रचंड कमिशनवर एजंटची ( १२ टक्के ) नेमणुका केल्या. विविध सेलिब्रिटींना आमंत्रित केले गुंतवणूकदारांना कमी वेळेत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
या गुन्ह्यात एकूण २५ आरोपी आहेत. त्यात मुख्य आरोपी महेश मोतेवार, वैशाली मोतेवार, लीना मोतेवार, प्रसाद पारसवार, सुवर्णा मोतेवार, अभिषेक मोतेवार, विशाल चौधरी व इतर आरोपींना या पुर्वी अटक केली आहे. सीआयडीकडे तपासाला असलेल्या ४ ही गुन्हात दोषारोपपत्र यापूर्वीच न्यायालयात दाखल केले आहे. अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक उत्तम वाळके, निरीक्षक शैलजा बोबडे, वनिता धुमाळ, हवालदार बाजीराव कुंजीर, प्रशांत पवार, राहुल कदम, निनाद माने, भूषण पवार व कविता नाईक यांनी ही कामगिरी केली.