- सावधान रहा, सायबर सेलची माहिती कायमस्वरुपी लक्षात ठेवा – डॉ. दीपक शहा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२०) :- विद्यार्थी, पालक एकूणच समाजात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर आज होत आहे. त्याचे फायदे जेवढे आहेत तेवढेच धोके देखील आढळून येत असल्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालय व क्वीक हिल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा‘ या व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक व प्राध्यापक यांच्यासाठी ऑनलाईन वेबीनारद्वारे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी पुणे सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पानमंद प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
या व्याख्यानात कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, क्वीक हिलच्या व्यवसायिक, सामाजिक जबाबदारी विभागाच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकारी सुगंधा दाणी, डॉ. जयश्री मुळे कार्यक्रमाच्या संयोजिका तसेच प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाच्या प्रमुख प्रा. हर्षिता वच्छानी समवेत सुमारे ७०० हून अधिक पालक, विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला.
मार्गदर्शन करताना सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पानमंद पुढे म्हणाले, भारतीय नागरीकांमध्ये इतरावर विश्वास ठेवणे हे नैसर्गिक स्वभाव असतो हा गुणधर्म ओळखून सायबर हल्लेखोर फेक प्रोफाईल तयार करतात, मैत्री वाढवितात नंतर परस्परात विश्वास संपादन करतात व फसवणूक करतात. वैयक्तिकरित्या सरकारी, खाजगी क्षेत्रात अतिसंवेदनशील विभागातील अधिकारी, कर्मचारी इतर प्रमुखाबरोबरही विश्वास संपादन करून गोपनीय माहिती हल्लेखोर सोशल मिडियाद्वारे काढून त्याचा दुरुपयोग इतरत्र करण्याची शक्यता असते. तसेच पैसे उकळणे, खंडणी धमक्या देणे आदी प्रकारही केले जातात. सोशल मिडीया आजच्या काळात रोजगार, व्यवसाय आदी क्षेत्रात नवसंजीवनी असती तरी, स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येकाने पुरेपुर तांत्रिक माहिती आत्मसात करणे, मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेटद्वारे व्यवहार, मैत्री करताना स्वतःवर बंधने घालणे अत्यावश्यकच आहे. गोपनीय सिक्युरिटी पासवर्डचा वापर करताना अनेकजण आपल्या मोबाईलचा नंबर, मुलांचे नाव, गाडी क्रमांक आदींच्याच वापर करताना आढळून आले आहे. त्यामुळे सायबर हल्लेखोरांकडून आपले खाते हॅक होवू शकतात. आपल्या कायम स्मरणात राहण्यासाठी गोपनीय सिक्युरिटी पासवर्ड हा स्वतःसाठी सोपा असावा मात्र; इतरांना मात्र अवघड वाटला पाहिजे. यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, फेसबुकवर मुलींनी आपले फोटो टाकू नये, आपला गोपनीय पासवर्ड इतरांना देवू नका, आपला डेटा सुरक्षित ठेवा, अति गोड बोलणार्यांपासून सावध रहावे, आपल्यावर सायबर हल्ला होण्यास आपणही तितकेच जबाबदार असतो त्यासाठी सदैव काळजी घेण्याची आवश्यकता असते गरज असेल तेव्हाच इंटरनेट चालू करावे, अनोळखी आणि फेक वेबसाईट्सपासून दूर व्हावे. प्रलोभने दाखवणार्या वेबसाईट टाळण्यात अनोळखी ई-मेल वरील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. आपणांस कोणताही ई-मेल आल्यास त्वरित सायबर तज्ञांशी संपर्क साधावा करावा. प्रसंगी सायबर पोलिसांत तक्रार नोंदवावी.
संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, “पालक व विद्यार्थ्यांनी सोशल मिडीया, लॅपटॉप, मोबाईल इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याआधी त्याचे प्रथम सखोल ज्ञान आत्मसात करणे ही काळाचीच गरज निर्माण झाली आहे. आज ऑनलाईन पगार, व्यवसाय, व्यवहार होत आहे. विद्यार्थी, पालक, समाज सजग होण्यासाठी विविध उपक्रमे संस्थेच्या वतीने राबविली जातात. आज आपण ऐकतो मात्र; कृती करीत नाही, यासाठी सावधान रहा, सायबर सेलची माहिती कायमस्वरुपी लक्षात ठेवा, इतरांबरोबर जे घडले ते आपल्याबरोबर घडू नये, अशी अपेक्षा डॉ. शहा यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ. राजेंद्र कांकरीया म्हणाले, सुरक्षा कशी करावी, काळजी काय घ्यावी. याबाबत माहितीपूर्ण व्याख्यान झाल्याबद्दल आभार मानून कोरोना प्रादुर्भावापूर्वी पालक विद्यार्थ्यांना मोबाईल बाजुला ठेव अभ्यास कर म्हणत होते, आता मात्र; मोबार्ईल उचल, अभ्यास कर, अशी म्हणण्याचीच पालकांवर वेळ आली आहे.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. हर्षिता वच्छानी यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत प्रा. सारिका जाधव यांनी तर, आभार ऋतुजा चव्हाण, प्रा. अमृता भंडारी यांनी मानले.