न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २ जाने.) :- दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होत असल्यामुळे हवामानात बदल होवून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावण्याचे धोरण पिंपरी चिंचवड मनपाने ठरविले आहे. त्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात वृक्षारोपनाचा कार्यक्रम हाती घेतला जातो. तसेच लावलेल्या वृक्षाची, रोपट्याची निगा राखता यावी, त्यांचे नागरिकांपासून, जनावरांपासून किवां इतर संभाव्य धोक्यांपासून संरक्षण व्हावे, याकरीता महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून, वृक्ष संरक्षक जाळी (ट्रि गार्ड) खरेदी केली जाते.
एकदा का या जाळ्या लावून झाल्या की, आपले काम संपले. या अविर्भावात उद्यान विभागाचे कर्मचारी व अधिकारी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. परंतु, कालांतराने वृक्षाभोवती लावलेल्या या जाळ्या त्यांची वाढ खुंटवण्याचे काम करतात व प्रसंगी या लोखंडी जाळ्या त्या वृक्षांना इजाही पोहचवत असतात. अगदी असाच काहीसा प्रकार चिखली-कुदळवाडी परिसरातील स्पाईन रोड, मैला शुध्दीकरण प्रकल्पाजवळ घडला आहे.
महापालिकेच्या वतीने जवळच रस्त्यावरील झाडांना वृक्ष संरक्षक जाळी (ट्रि गार्ड) लावलेली आहे. वाढ होऊनही बऱ्याच दिवसांपासून या वृक्षांची संरक्षक लोखंडी जाळी काढलेली नाही. त्यामुळे या वृक्षास इजा पोहचत आहे. याची दखल घेत चिखली-कुदळवाडीतील स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी मनपाचे उद्यान अधिकारी सुरेश घोडे यांना घटनास्थळी बोलावून परिस्थितीची जाणीव करून दिली व वृक्ष संरक्षक जाळी (ट्रि गार्ड) हटवण्याच्या सूचना केलेल्या आहेत.
उद्यान अधिकारी सुरेश घोडे यांनी लवकरच परिसरातील वृक्ष संरक्षक जाळी (ट्रि गार्ड) हटवण्याच्या हालचाली करून, कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याचे, दिनेश यादव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.