- महाराजांशिवाय भारताच्या गौरवाची कल्पनाही करता येणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२१) :- पुण्यामधील शिवसृष्टीमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विशेष संदेश दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या आपल्या भावनाही व्यक्त केल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य आजही आपल्या देशाला प्रेरणा देत असल्याचं सांगतानाच छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय आपल्या देशाचा विचारही करता येणार नाही असंही मोदी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या इतिहासाचे शिखर पुरुष आहेत. शिवाय भारताचा वर्तमानकाळ आणि भूगोलसुद्धा त्यांच्या अमरगाथेने प्रभावित झालेला आहे. आपल्या या भूतकाळाचा, वर्तमानाचा आणि भविष्याचा विचार केल्यावर एक खूप मोठा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं? छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय भारताच्या सध्याच्या स्वरुपाची भारताच्या गौरवाची कल्पनाही करता येणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आदर्श बाबासाहेबांनी देशासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय तो आम्हाला कायमच प्रेरणा देत राहणार आहे, असंही मोदींनी बाबासाहेबांच्या कार्याचं कौतुक करताना म्हटलं.