न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १८ जुलै २०२५) :- श्रीक्षेत्र आळंदी येथे दोन दिवसीय महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे. याचा प्रारंभ शनिवारी (दि. १९) होणार असून, यात महाराष्ट्रातील ६० कीर्तनकार आणि १५० सरपंच सहभागी होणार आहेत. परिषदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, यशोधन महाराज साखरे आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एमआयटी स्कूल ऑफ एज्युकेशनच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शलिनी टोणपे आणि राष्ट्रीय सरपंच संसदेचे सह समन्वयक प्रकाश महाले उपस्थित होते.
‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एज्युकेशन पुणे आणि एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमानवाडी आळंदी (देवाची) येथील डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूलमध्ये ही परिषद पार पडणार आहे.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून ही गोलमेज परिषद आयोजित केली आहे. याचा प्रारंभ अन्न व औषधे प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी दुपारी ३ वाजता होणार आहे. वारकरी संप्रदायाची २१ व्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची दिशा, स्वरूप, समस्या व आव्हाने आणि निराकरणाची संभाव्य कृतिशील उपाययोजना हा या परिषदेचा प्रमुख विषय असणार आहे. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड राहणार असून, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड, आमदार श्रीकांत भारतीय, राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आदींची उपस्थिती असेल.












